मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रालाही बसला. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही कमी झालेला नाही. तर, राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी उद्या संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. ”जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, असं मला वाटत नाही. पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे.” असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.
तसेच, सुरूवातीला त्यांनी, जिद्दीनं आणि निश्चयानं बंधनं पाळल्याबद्दल धन्यवाद.. असं म्हणत जनतेचे आभारही मानले. याचबरोबर, आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. असंही ते म्हणाले. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे तिकडे निर्बंध शिथिल करण्यावर तर ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तेथे निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”काहीजण असं म्हणत आहेत की लाट आता ओसरत आहे, मग आता काय करणार हे निर्बंध उठवणार का? याबाबत देखील तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता वाटते, की नेमकं आपण कुठं आहोत? आज राज्यात 18 हजारांच्या आसपास रूग्ण संख्या आहे. मात्र दोन-चार दिवसांअगोदरचा आकडा पाहिला तर, गेल्या लाटेत जी सर्वोच्च संख्या होती. तिच्या तुलनेत आता थोडीशी कमी होते आहे. त्यावेळी आपण जे शिखर गाठलं होतं. ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं.
लसीकरण वेगवान करणार –
45 च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतली आहे. तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण चोवीस तास लसीकरण करू. आपली क्षमता आहे. परंतु त्याला मर्यादा आहे. लसीची उत्पादन क्षमता तितकी झालेली नाही. जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात आलं होतं. जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. सव्वादोन कोटी नागरिकांना आपण लसीकरण केलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लवकरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.