सोनम परब
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर महिलाप्रधान कथानके भरपूर पाहावयास मिळत आहे. यामध्ये अलीकडेच प्रदर्शित झालेल्या विद्या बालनच्या “जलसा’ चित्रपटाचा उल्लेख करता येईल. विद्याने यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारली आहे.
बॉलीवूडमध्ये केवळ नायकच नाही, तर नायिकादेखील चित्रपटांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत असतात. गेल्या काही वर्षांत महिला पत्रकारांचे जीवन सांगणारे किंवा भूमिका असणारे चित्रपट झळकत आहेत. काही काल्पनिक तर काही सत्यघटनेवर आधारित आहेत. यातून महिला पत्रकारांची भूमिका निर्भीड, निष्पक्ष आणि धाडसी अशीच दाखवली आहे. जनतेला न्याय मिळवून देण्यात महिला पत्रकार जीवाची बाजी लावतात, असे दाखवण्यात निर्माते यशस्वी ठरले आहेत.
नूर : 2017 मध्ये पाकिस्तानच्या कादंबरीकार सबा इम्तियाज यांच्या “कराची यू आर किलिंग मी’ या पुस्तकावर आधारित “नूर’ चित्रपट झळकला होता. यात सोनाक्षी सिन्हाने नूर नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारली. तिची भूमिका वाखणण्याजोगीच राहिली आहे. फीचर स्टोरीजवर अधिक फोकस करणाऱ्या नूरला गंभीर पत्रकारिता करण्याची देखील इच्छा असायची. एकदा बेकायदा धंदे करणाऱ्या टोळीचा शोध लागतो आणि नूरच्या जीवनाचा कायापालट होतो.
जलसा : ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेला विद्या बालनचा “जलसा’ चित्रपट खास आहे. विद्या बालनने माया मेननची भूमिका साकारली आहे. ती एका बहुचर्चित न्यूज चॅनेलची प्रसिद्ध पत्रकार आहे. रात्री घरी परतत असताना एक अनोळखी मुलगी मायाच्या मोटारीला धडकते आणि या घटनेने भयभीत झालेली माया तेथून पळ काढते. ही गोष्ट तिला लपवायची असते, परंतु त्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका शिकाऊ पत्रकाराला त्याचे पुरावे हाती लागतात. चित्रपटाच्या शेवटपर्यंत कथानकाबाबतची उत्सुकता ताणली जाते.
पीके : आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला “पीके’ हा चित्रपट कोण विसरू शकेल. या चित्रपटातील महिला पत्रकाराची भूमिका अनुष्का शर्माने उत्कृष्टरित्या साकारली आहे. तिचे नाव जननी असून ती ब्रेकिंग न्यूजसाठी सतत धडपड करत असते; परंतु तिची गाठ जेव्हा एलियन (आमिर खान) शी पडते, तेव्हा तिचा संघर्ष थांबतो. हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असून तो समाजाला चांगला संदेश देण्यात यशस्वी ठरला आहे.
मद्रास कॅफे : हा एक राजकीय चित्रपट आहे. 1980-90 च्या दशकात नेणारा हा चित्रपट आहे. श्रीलंकेतील तमिळ संघटनेकडून श्रीलंकेत फूट पाडण्याचे कारस्थान रचले जाते आणि त्यासाठी संघटनेने देशाविरोधात युद्धही पुकारलेले असते. यात नर्गिस फाकरीने ब्रिटिश पत्रकार जया साहनीची भूमिका केली आहे. ती यादवी युद्धामागचे कारण जाणून घेण्यासाठी श्रीलंकेत येते. त्याचवेळी तिला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येशी निगडीत काही पुरावे हाती लागतात.
सत्याग्रह : भारतातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारा “सत्याग्रह’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. चित्रपटात करिना कपूरने यास्मिन अहमदची भूमिका साकारली आहे. ती एक सक्षम टीव्ही जर्नालिस्ट असते. ती राजकीय पक्षाच्या एका गटात सामील होऊन व्यवस्थेची हेळसांड करणाऱ्या तरुण राजकीय नेत्याविरोधात आंदोलन करते. करिनाच्या अभियनाचे कौतुक झाले आहे.
सिंग साहब द ग्रेट : हा चित्रपट एका गुंडाचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर आधारलेला आहे. या व्यक्तीचे आयुष्य त्या गुंडाने उद्ध्वस्त केलेले असते. त्या अज्ञात नायकाचा खुलासा टीव्ही पत्रकार शिखा चतुर्वेदी (अमृता राव) करते. कानावर पडणाऱ्या गोष्टीची खातरजमा करून सत्य लोकांसमोर आणणे हे पत्रकाराचे कर्तव्य असल्याचे दाखवण्यात आले आहे.
मुंबई मेरी जान : 2006 च्या रेल्वे स्फोटाची पार्श्वभूमी असलेला “मुंबई मेरी जान’ चित्रपट आहे. या भयानक घटनेने लोकांचे आयुष्य कसे बदलते, याचे वास्तव दर्शन घडवले आहे. यात एक टीव्ही रिपोर्टर रूपाली जोशी (सोहा अली खान) असते. तिच्या नियोजित पतीचा स्फोटात मृत्यू होतो आणि तिच्याच न्यूज चॅनेलवर तिच्या प्रियकराची कहानी तिखटमीठ लावून सादर केली जाते. या आधारे चॅनेलचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. एका यशस्वी रिपोर्टरच्या आयुष्यात प्रोफेशनल आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन साधताना एकटेपणा कसा येतो, हे दाखवले आहे.
लक्ष्य : या चित्रपटात प्रिती झिंटाने रोमिला दत्तची भूमिका साकारली आहे. ती एक विद्यार्थी कार्यकर्ता असण्याबरोबरच महत्त्वाकांक्षी पत्रकार देखील आहे. तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका ऋतिक रोशनने साकारली आहे. कालांतराने दोघांचेही मार्ग वेगळे होतात, परंतु कारगिल युद्धामुळे पुन्हा ते समोरासमोर येतात. रोमिला दत्तची भूमिका प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांच्यावर आधारित आहे. त्यांनी 1999च्या कारगिल युद्धाचे मोठ्या साहसाने वार्तांकन केले होते.
पेज थ्री : याचे दिग्दर्शन मधुर भांडाकर यांनी केले आहे. या चित्रपटातील माधवी शर्मा नावाची भूमिका कोंकणा सेन हिने साकारली आहे. ती तरुण पत्रकार असून मुंबईत कामाच्या शोधात असते. दीपक सूरी (बोमन इराणी) हे संपादक असतात आणि त्यांच्याकडे ती काम करू लागते. तिला वर्तपानपत्रातील पेज-3 सेक्शन दिले जाते आणि या आधारे सेलिब्रिटी कव्हर करण्याची जबाबदारी असते. प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीगाठी होताना अनेक धक्कादायक गोष्टी तिच्यासमोर येतात व तिचा अपेक्षाभंग होतो.
नो वन किल्ड जेसिका : जेसिका लाल मर्डर मिस्ट्रीवर आधारित हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. बहिणीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचा शोध घेणे आणि न्याय मिळवून देणे यासाठी धडपड करणाऱ्या एका बहिणीची कथा आहे. जेसिकाचा एका पार्टीत खून होतो. यात मीरा गैत नावाच्या पत्रकाराची भूमिका राणी मुखर्जी यांनी साकारली आहे. तिला या घटनेची माहिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून मिळते. मीराला हे प्रकरण सुरुवातीला खूपच साधे वाटते, परंतु जेव्हा ती अधिक सखोल तपास करते तेव्हा राजकीय कनेक्शन पाहून तिला धक्का बसतो. ती संपादकासमवेत वेगवेगळे स्टींग ऑपरेशन करते. या आधारे देशातील मोडकळीस आलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
फिर भी दिल है हिंदुस्थानी : सुपरस्टार शाहरुख खानचा 2000 साली फिर भी दिल है हिंदुस्थानी नावाचा चित्रपट आला. हा चित्रपट न्यूज वाहिन्यांवरील स्पर्धा आणि टीआरपीसाठी सुरू असलेली चढाओढ यावर आधारलेला आहे. दहशतवादी नसलेल्या व्यक्तीला दहशतवादी ठरवून त्याला फाशी देण्याचे नियोजन केले जाते. परंतु वृत्त वाहिन्यांचे पत्रकार शाहरुख खान आणि जुही चावला हे त्याची सुटका करतात. पत्रकार अजय बक्षीची भूमिका शाहरुख खानने तर पत्रकार रिया बॅनर्जीची भूमिका जुही चावलाने साकारली आहे.