नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे पोटतिडकीने करोना प्रतिबंधक नियम पाळा, असे आवाहन करताना आपल्याला दिसतात. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे शिलेदार आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेच या नियमांची पायमल्ली करण्यात आघाडीवर असल्याचे नाशिकमध्ये दिसत आहे. यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
नाशिकमध्ये शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात हा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, यावेळी करोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करण्यात आली. कार्यक्रमात अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. हे कार्यक्रम 50 पेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले. पोलिसांनाही यावेळी दुर्लक्ष केले. मग सरकार जे नियम जाहीर करते, त्यातून सत्ताधाऱ्यांना सूट असते का, या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, असा सवाल विचारण्यात आला आहे.
राज्यात 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने अतिरिक्त निर्बंध काय असतील, याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. मात्र, या नियमांचा सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना विसर पडला.