टप्पा दोनमधील स्थिती : 150 ते 175 लहान मोठ्या कंपन्या, उद्योग पूर्णपणे बंद
शिंदे वासुली- करोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी केल्यामुळे चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील सुमारे 150 ते 175 लहान मोठ्या कंपन्या, उद्योग व्यवसाय मंगळवार (दि. 24) पासून 31 मार्चपर्यंत पुर्णपणे बंद (लॉक डाऊन) झालेल्या आहेत.
चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांनी यापूर्वीच अर्ध्याच्यावर कामगार कपात करून फक्त 20 टक्के लेबर वर्कवर प्रोडक्शन सुरू होते. टेट्रा पॅक कंपनीतर फक्त पाच टक्के कामगार कामावर होते. तर काही कामगार संचारबंदी लागू होण्यापूर्वीच गावी निघून गेले होते. एमआयडीसीतील कंपन्यातील ऑफिस स्टाफ व कुशल कामगारवर्ग पुणे व पिंपरी-चिंचवड सारख्या शहरातून येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त करून सर्व कंपन्या बंद करण्याची मागणी केली होती. कंपन्या बरोबर कन्स्ट्रकशन कामावरही कामगार येईनासे झाल्याने औद्योगिक वसाहतीतील सगळी बांधकामेही थांबली आहेत.
एमआयडीसी परिसरातील बहुतेक कामगार आपल्या परिवारासह गावी निघून गेले आहेत; परंतु शिंदे, वासुली, भामचंद्र नगर, भांबोली, सावरदरी, वराळे येथे अजुनही बरेचसे लोक भाड्याच्या खोल्यांमध्ये राहात आहेत. एक तर त्यांना गावी घरी जायचे आहे; परंतु एसटी, बसेस, रेल्वे व खासगी वाहतूक बंद आहे. शिवाय इतर ठिकाणी पुण्यावरून आलेल्या व्यक्तीला गावांमध्ये प्रवेश दिला जात नाही. म्हणून नाईलाजास्तव आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमुळे मात्र स्थानिक नागरिकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
जीवनावश्यक असलेल्या भाजी व किराणा मालाच्या दुकानावर पोलीस प्रशासनाचा गर्दीने, घोळक्याने उभे राहू नये असा आदेश असतानाही हे परप्रांतीय लोक समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. वासुली फाट्यावरील भाजी व किराणा मालाच्या दुकानात संचारबंदी असतानाही या लोकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती.
बंदोबस्तासाठी असलेल्या महाळूग़े पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गर्दी नकरण्याचे आवाहन करुनही दूर्लक्ष करणाऱ्यांना शेवटी पोलीसांनी लाठीचा प्रल्हाद दिला. गर्दी पांगवण्यासाठी पोलीसांनी सुचेना, विनंती व लाठीमारही केला. पण हे निर्ढावलेले लोक ऐकत नव्हते. यावेळी स्थानिक नागरिकांनी भाजीची दुकाने बंद करण्याची मागणी पोलीसांकडे केली. परंतु शासनाने भाजी जीवनावश्यक वस्तू असल्याने ती दुकाने बंद करु शकत नाहीत. परंतु होणारी गर्दी कमी करण्यासाठी आम्ही नक्कीच काम करतोय. व यासाठी स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेऊन पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
- या परिसरात सकाळी 7 ते 10 किराणा मालाची दुकाने सुरू
करोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी वासुली फाटा व गावठाणातील किराणा माल व भाजीपाल्याच्या दुकानावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी वासुली, भामचंद्र नगरमधील स्थानिक नागरिकांनी, पोलीस पाटील, गाव कारभारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भाजीपाला व किराणा मालाच्या व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती व आवाहन करण्यात आले. त्यानुसार गावठाणातील व वासुली फाट्यावरील सर्व भाजीपाला व्यावसायीकांनी मंगळवार (दि. 24) पासून दुकाने बंद ठेवली व किराणा मालाची दुकाने सकाळी फक्त 7 ते 10 वाजेपर्यंतच दुकाने चालू ठेवली जात आहेत. येथील स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद केल्याने आज फाट्यावर खऱ्या अर्थाने संचारबंदी असल्याचे चित्र दिसत होते. या कामी पोलिसांनी ही नागरिकांचे आभार मानले. - वासुली फाट्यावर वाहनांची कसून चौकशी
संचारबंदी व वाहतूक बंदीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 24) वासुली फाट्यावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. गावात व एमआयडीसी परिसरात उगीच भटकणाऱ्यांना माघारी फिरवले जात आहे. पोलीसांनी चौकाचौकात केलेली नाकाबंदी व मेडीकल सोडून बाकीची सगळी दुकाने बंद असल्याने वासुलीफाटा व परिसरात नुसता शुकशुकाट होता.