लखनौ – भारत सर्वांधिक लोकसंख्येचा देश बनणे ही चिंताजनक बातमी आहे. केंद्र सरकारचे अपयश हे त्यामागील कारण आहे, अशी टिप्पणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरूवारी केली.
चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश बनला. त्याबाबतची आकडेवारी बुधवारी संयुक्त राष्ट्रांनी जारी केली. त्या घडामोडीवर भारतातील सर्वांधिक लोकसंख्येचे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांनी ट्विटरवरून भाष्य केले.
गरिबी आणि बेरोजगारीमुळे कामात मदत व्हावी यासाठी तसेच पैसा कमवण्यासाठी अनेक जण अधिक मुले जन्माला घालतात. वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने काहींना बालमृत्यूची धास्ती वाटते. त्यामुळेही अधिक मुलांना जन्म देण्याकडे कल असतो. पुरेशा प्रमाणात गर्भनिरोधकांचे वितरण केले जात नाही.
तसेच, शिक्षणाच्या अभावामुळे लोकसंख्येचा दबाव अनेकांना समजत नाही. त्यातून लोकसंख्या वाढते, अशी भूमिका त्यांनी मांडली. भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख इतकी नोंदली गेली आहे. ती 2050 या वर्षापर्यंत 167 कोटींपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.