मंचर- येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांच्या जन्म कल्याणकचे सर्व धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक रद्द करून जैन समाजाच्या वतीने गरीब, गरजू व अनाथ नागरिकांना अन्नदान करण्यात आले, तसेच मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. मंचर येथील संभाजी चौक, मातंगवस्ती, दलितवस्ती,लोणारगल्ली व बाजारपेठ येथे गरिबांसाठी अन्नदान करण्यात आले.
प्रसंगी तहसीलदार रमा जोशी, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपस्थित होते. क्रीडा संकुलजवळील नवीन पाण्याच्या टाकीजवळ नांदेड येथील अनेक मजूर कुटुंबे राहतात.त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना जैन संघाच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये तेल, बेसन, तांदूळ, गहू, डाळी, मटकी, मिरची, मीठ, मसाले, साबण आदी वस्तूंचा समावेश होता. सुलतानपूर रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळील बुलढाणा येथील बांधकाम मजुरांच्या वस्तीवरील कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच दत्ता गांजाळे, युवराज बाणखेले, सुहास बाणखेले, आशिष पुंगलिया, महसुल विभागाचे मंडल अधिकारी सुनील नंदकर, तलाठी विलास शिगवण, कोतवाल संदीप पडवळ, प्रशांत भंडारी, दीपेश भंडारी, मेहुल भंडारी आदी उपस्थित होते. लॉकडाऊन संपेपर्यंत फासेपारधी वस्तीवर पाण्याच्या टॅंकरची सोय करण्यात आली. इंदिरा वस्ती,डोबीमळा आणि गांजाळे मळ्यामधील कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या वस्तीवर कर्नाटक व मध्यप्रदेश येथील मजूर आहेत. संपूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये पोलीस बांधवांची जेवणाची व्यवस्था जैन संघाने केली आहे.