औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सध्या ते त्यांच्या समर्थक आमदारांना घेऊन आसाममधल्या गुवाहाटी इथल्या एका हॉटेलवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करून देखील बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आंदोलन करीत रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबादेतल्या क्रांती चौकात अनेक शिवसैनिक दाखल झाले आहेत. यावेळी आंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांविषयी नाराजी व्यक्त केली.
यावर तोडगा निघेल
ते म्हणाले , की या सगळ्या आमदारांनी कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. यावर तोडगा निघेल. एकनाथ शिंदे सांगत असलेला आकडा त्यांच्याकडे नाही, बरेचसे आमदार शिवसेनेसोबत आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले. 12 आमदारांना सध्या नोटीस देण्यात आली आहे. पक्षाविरोधात काही होत असेल तर कारवाई करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. तर आमदारांना दिलेल्या नोटिशीनंतर विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकाराद्वारे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी माहिती दानवे यांनी दिली.
स्वत:ला शिवसैनिक म्हणवता मग पक्षप्रमुखांचा आदेश का मानत नाही ? असा सवाल आंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केला आहे. पक्षप्रमुख वारंवार सांगत असताना अशा पद्धतीने भूमिका घेणे चुकीचे आहे. तर बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय शिवसेनेसाठी नुकसान करणारा असला तरी पक्षाच्या हितासाठी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे ते यावेळी म्हणाले.