नवी दिल्ली – धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांचा गदारोळ सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम ( Rajendra Pal Gautam ) यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केले होते व त्याचे व्हीडीओही व्हायरल झाले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने आपला लक्ष्य केले होते. त्यानंतर आता गौतम यांचा राजीनामा आला आहे.
काही हिंदूंनी बौध्द धर्माचा त्या कार्यक्रमात स्वीकार केला होता. तेव्हा तेथे एक शपथ घेण्याचाही कार्यक्रम झाला होता. आम्ही श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा करणार नाही असे या शपथेत सांगितले गेल्याचे त्या व्हीडीओत दिसते आहे. मात्र हा प्रकार हिंदू आणि बौध्द यांना परस्परांशी लढवण्याचा प्रकार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला होता. राजेंद्र गौतम ( Rajendra Pal Gautam ) यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली होती.
दरम्यान, गौतम ( Rajendra Pal Gautam ) यांनी एक निवेदन जारी करून सगळ्यांची माफी मागितली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मी एक धार्मिक व्यक्ती आहे. सर्व देवी-देवतांचा सन्मान करतो. कोणाच्या धार्मिक श्रध्देच्या विरोधात मी काहीही बोललेलो नाही. सगळ्यांच्या श्रध्देचा मी आदर करतो. भारतीय जनता पार्टीच्या अपप्रचारामुळे जे कोणी दुखावले गेले असतील त्यांची मी माफी मागतो.
ते पुढे म्हणाले की त्यांनी भाषणात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महागाईबद्दल भाष्य केले होते. मात्र भाजपने याचा चुकीचा प्रचार केला. त्यांच्या या कृतीमुळे आपण कष्टी झालो आहोत असे गौतम यांनी म्हटले आहे.