कुशीनगर – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत दिलेल्या “लडकी हूं, लड सकती हूं’ या घोषणेचा काहीही परिणाम होणार नाही, असे माजी केंद्रीय मंत्री आर पी एन सिंह यांनी म्हटले आहे. आर.पी.एन. सिंह यांनी अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महिला सशक्तीकरण दाखवून देण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या नेत्यांच्या सौबाग्यवतींनाच निवडणूकीची तिकीटे दिली आहेत, अशी टीका एकेकाळी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले रतनजीत प्रताप नारायण सिंह उर्फ आरपीएन सिंह यांनी केली.
उत्तर प्रदेशातील मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते स्वामी प्रकाश मौर्य यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केल्याचाही काही परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सबका साथ, सब का विकास’ या सर्वसमावेशक मंत्राच्या आधारे जातीचे अडथळे तोडून टाकली आहेत, असेही सिंह म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्वच उरलेले नाही. कॉंग्रेसला आता विचारधाराच उरली नाही. “लडकी हूं, लड सकती हूं’ या पोस्टरमधील मुलगीही आता भाजपमध्ये गेली आहे. निवडणूकीत प्रत्येकजणच घोषणा देत असतो. मात्र कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पत्नींनाच तिकीटे दिल्यामुळे “लडकी हूं’ या घोषणेला काही अर्थ राहिला नाही, असे ते म्हणाले.
आरपीएन सिंह हे पद्रुणा या राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांचे वडील सीपीएन सिंह हे पद्रुणा विधानसबा मतदारसंघातून 1996 पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते. आरपीएन सिंह हे स्वतः निवडणूक लढवत नसले तरी कुशीनगरमधील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. कुशीनगरमध्ये सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी मतदान होणार आहे.