लखनौ – भारतीय जनता पक्ष हा मुजोरी, महागाई आणि खोटारडेपणाचे प्रतीक बनला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल आझमगड येथील कार्यक्रमात बोलताना समाजवादी पक्षाचा उल्लेख जिना, आझम खान आणि मुख्तार अन्सारींचा पक्ष अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अखिलेश यांनी ही टीका केली.
बीजेपीचा उल्लेख झुंट, अहंकार आणि महागाई निर्माण करणारी पार्टी असा केला. भाजपने साऱ्या देशात महागाईचा आगडोंब केला आहे. इंधन दरवाढीला आज कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. त्यांच्या राज्यात आता कोणत्याही दिवशी पेट्रोलचा दर दीडशे रुपयांवर जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
भारतीय जनता पक्षाचा कोणताही निर्णय केवळ इलेक्शन केंद्रित असतो असे नमूद करून ते म्हणाले की, आज निवडणुका जवळ आल्या की ते इंधनाची दरवाढ तात्पुरती थांबवतात आणि इलेक्शन झाली की दुसऱ्या दिवसापासून त्यांची दरवाढ सुरू होते.
गरिबांनाही केवळ इलेक्शन होईपर्यंतच अन्नधान्य दिले जाते; पण आपला पक्ष सत्तेवर आला तर गरिबांना संपूर्ण वर्षभर स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही अखिलेश यांनी आज खुशीनगर येथे बोलताना दिली.