मुंबई – ठाकरे गटाचे खासदार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला शिंदे सरकारचं ओझं झाल्याचे विधान संजय राऊत यांनी केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे विधान केले आहे. यावर आता शिंदे गट काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
“महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला सध्याच्या सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचं हा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा मी ऐकत आहे. अर्थात तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी बारसू प्रकरणाबाबत देखील भाष्य केलं. “स्थानिकांचा या सरकारवर विश्वास नाही. सत्ताधारी उद्धव ठाकरे यांचं पत्र दाखवत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, केंद्राकडून वारंवार पर्यायी जागेची मागणी होत होती. म्हणून उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागा सूचवली. पण सत्तेत असताना जागा मिळावी यासाठी जबरदस्ती केली नाही. लोकांचा नकार असल्यास बारसूही नको ही आमची भूमिका होती,” असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी बारसूतील भूसंपादन रद्द करा आणि सर्व्हेक्षण मागे घ्या, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला. त्यामुळे पुढील काळात यावरून अधिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप म्हंटले होते. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आमच्या महाराष्ट्रात नागाची, सापाची पूजा केली जाते. त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. तो शेतीचा चौकीदार असतो. मला वाटतं या गोष्टीला फार महत्त्व देण्याची गरज नाही,” असे म्हणत संजय राऊत यांनी खर्गे यांच्या विधानाचे समर्थन केलं आहे.