पुणे – बदलते हवामान, शेतमालावर होणारा परिणाम व शेतमालाच्या पडणाऱ्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीकरिता केंद्र सरकारने मधमाशी पालन व्यवसायासाठी अनुदान दिले आहे. कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय करणे शक्य असल्याने, या योजनेचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी आवाहनदेखील केले आहे.
मधमाशांमुळे परागकणांच्या होणाऱ्या बीज वहनामुळे होणाऱ्या प्रजननाने निसर्गाचा समतोल राखला जातो. मात्र, व्यापारी तत्वावर मधमाशी पालन केल्यास त्यापासून कमी गुंतणुकीत शेतीपूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्न देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. हा व्यवसाय गावात किंवा शहरात कुठेही सुरू करता येऊ शकतो.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीक उत्पादकता सुधारण्यासाठी मधमाशी पालन विकास नावाची केंद्रीय योजना सुरू केली आहे. मधमाशी पालनाचे क्षेत्र विकसित करणे, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण देणे आणि जनजागृती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. नॅशनल बी बोर्डाने नाबार्डच्या सहकार्याने भारतात मधमाशी पालनासाठी आर्थिक सहाय्याच्या योजनाही सुरू केल्या आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 80 ते 85 टक्के अनुदान देते.
केवळ 35 हजार रुपयांत 10 पेट्या घेऊनही मधमाशी पालन व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. एका पेटीतुन 40 किलो मध मिळते. या दहा पेट्यांमधून एकूण मध 400 किलो होईल. 350 रुपये प्रति किलो दराने 400 किलो विकल्यास 1.40 लाख रुपये मिळतील.