नवी दिल्ली- सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याच्या प्रभावाबद्दल आणि परिणमांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी केली आहे. तामिळनाडूचे माजी आमदार एस शेखर यांनी 2018 मध्ये एका फेसबुक पोस्टवर एका महिला पत्रकारांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केली होती.
त्याबद्दल त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करून खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्याच्या आज झालेल्या सुनावणीच्यावेळी कोर्टाने ही सूचना केली.
दरम्यान त्यांची ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी आर गवई आणि पी के मिश्रा यांच्या खंडपीठासमोर शेखर यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपिल दाखल केले होते. ज्यात त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.
त्यांचे हे अपिल फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,जर कोणी सोशल मीडिया वापरत असेल तर त्याने त्याचा प्रभाव आणि त्याच्या परिणामांविषयी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे, कोणतीही पोस्ट करताना ही काळजी घेणे गरजेचे आहे असे खंडपीठाने याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाला सांगितले.