नवी दिल्ली – लॉकडाऊनचे निर्बंध उठवताना सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी योग्य ती काळजी घ्यावी, याचा गैरफायदा घेऊन लोकांकडून बाजारांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी केली जाण्याची शक्यता असते तसे प्रकार टाळावेत, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी एका निवेदनाद्वारे सर्व राज्यांना ही सूचना केली आहे. सर्व राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अधिकाधिक लोकांना लसीकरणाचे संरक्षण द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामान्य नागरिकांना मोठाच फटका बसला असून करोनाच्या केसेसमध्येही प्रचंड वाढ या काळात झालेली दिसली. आता करोनाच्या केसेस कमी होत असल्याने अनेक राज्ये आपल्या हद्दीतील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करीत आहेत.
हे निर्बंध सरसकट उठवले जाऊ नयेत, ग्राऊंड लेव्हलची माहिती घेऊनच यावर योग्य ती उपाययोजना केली गेली पाहिजे, असेही केंद्रीय गृह सचिवांनी म्हटले आहे. कोविडचे निर्बंध उठवल्यानंतर त्या भागातील कोविड रुग्ण संख्येवरही लक्ष ठेवले गेले पाहिजे, असेही सर्व राज्यांना सुचवण्यात आले आहे. टेस्ट-ट्रॅक- ट्रीट ही त्रिसूत्री सर्वच राज्यांनी कायम ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.