पुणे : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील आडते अखेर पुणे बाजार समिती प्रशासनापुढे नरमले आहेत. बाजार समितीच्या सुचनेनुसार “मदतनीस’ दोनच डमी आणि एकच सहायक असल्याचे प्रतिज्ञापत्र चार आडत्यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहुन दिले आहे. दरम्यान प्रतिज्ञापत्र देण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. तोपर्यंत आडत्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून दिले जाणार आहे.
फळ, भाजीपाला विभागात डमी आडत्यांचा सुळसुळात झाला आहे. त्यामुळे दुबार विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे.
या परिस्थिती नवनिर्वाचित संचालक मंडळ ऍक़्शन मोडमध्ये आहे. त्यांनी सुरूवातीला बाजाराची विक्रीची वेळ निश्चित केली. त्यानंतर दोनच डमी असल्याचे लिहून देण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र, यास आडत्यांनी विरोध केला होता. बाजार समितीने ठरवून दिलेल्या वेळेत एकाही आडत्याने प्रतिज्ञापत्र दिले नव्हते. याबाबतचे वृत्त “दैनिक प्रभात’ने प्रसिध्द केले होते. त्यानंतर बाजार समितीकडून आडत्यांवर कारवाई करण्यात येणार होती. मात्र, आता मुदतवाढ दिल्याने तूर्तास कारवाई टळली आहे. 31 जुलैपर्यंत 750 पैकी किती आडते प्रतिज्ञापत्र देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
“आडते असोसिएशनने 31 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र जमा करण्याचे आवाहन मॅसेजद्वारे आडत्यांना केले आहे. त्यानुसार आडत्यांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानुसार 31 जुलैपर्यंत येणारी प्रतिज्ञापत्र स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.” – महेंद्र काळभोर, विभागप्रमुख, फळे-भाजीपाला, पुणे बाजार समिती