इस्लामाबाद – भारत सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याच्या कठोर तरतुदीं अंतर्गत मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या संघटनेवर बंदी घालण्यात आली असल्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी केली आहे. या संघटनेचा प्रमुख मसर्रत आलम भट हा पाकिस्तानच्या समर्थनाने भारत विरोधी अजेंडा चालवण्यासाठी ओळखला जातो.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या कारणावरून या संघटनेवर बंदी घातली गेली असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. भारताच्या या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानात उमटले असून त्या देशाने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत सरकारच्या निर्णयावर टीका करणारे आणि त्याला आक्षेप घेणारे निवेदनच पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केले आहे. भारताने अत्यंत चुकीच्या पध्दतीने मसर्रत आलम भट याच्या पक्षावर पुढच्या पाच वर्षांसाठी बंदी घातली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. मसर्रत गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील तुरूंगात आहे आणि त्याला अजुन २० वर्षे तुरूंगात राहावे लागणार आहे. भारत त्याच्यावर अन्याय करत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
भारत सरकारने बंदी घातलेला जम्मू काश्मीरमधील हा पाचवा पक्ष आहे. त्यांनी यापूर्वी जम्मू ॲंड काश्मीर लिबरेशन फ्रंट, जमाते इस्लामी जम्मू ॲंड काश्मीर, दुख्तरान ए मिल्लत आणि जम्मू काश्मीर डेमोक्रॅटीक फ्रिडम पार्टी या चार पक्षांवर बंदी घातली आहे. या पक्षांच्या प्रमुखांची संपत्ती भारताने जप्त केली असून त्यांना बऱ्याच काळापासून तुरूंगात ठेवलेले आहे.
भारताने या वर्षाच्या सुरूवातीला ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सच्या श्रीनगर येथील कार्यालयालाही टाळे ठोकले आहे. अशा कारवाया करून भारत संयुक्त राष्ट्र चार्टरच्या मूलभुत सिध्दांतांचे उल्लंघन करत आहे असा आरोप पाकिस्तानने केला आहे.