ram mandir – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना आता इतक्यातच त्यांनी अयोध्या येथे रामललांचे दर्शन घेण्यासाठी जाण्याची घाई करू नये असे आवाहन केले आहे. २२ जानेवारी रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे सगळेच जण दर्शनासाठी जाण्यास उत्सुक असून मंत्र्यांनी मात्र आताच गडबड करू नये असा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काही महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. या व्हीआयपींना त्याच दिवशी दर्शनाचा लाभ घेता आला. मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी मंगळवारी मंदिराची दारे खुली झाली होती व पहिल्याच दिवशी दर्शनासाठी प्रचंड झुंबड उडालेली पाहायला मिळाली. उपलब्ध आकडेवारीनुसार जवळपास पाच लाख भाविकांना पहिल्याच दिवशी दर्शनाचा लाभ घेता आला.
मंगळवारी रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. प्रचंड गर्दी उसळल्यामुळे थोडा वेळ दर्शन कार्यक्रम थांबवावाही लागला होता. आताही गर्दी कायम असून त्यात जर कोणी मंत्री तेथे दर्शनासाठी गेले तर त्यांच्या प्रोटोकॉलमुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेण्यासाठी आणखी त्रास होणार आहे. त्यामुळे किमान फेब्रुवारी महिना पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांनी दर्शन घेण्यासाठी जाणे टाळावे असे पंतप्रधानांनी सूचित केले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.