– हेमंत देसाई
भारताला आपल्या कारवाईने त्रास देणाऱ्या पाक सरकारलाच आता दहशतवाद्यांनी घेरले असून, तरीदेखील पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आलेले नाही.
पाकिस्तानच्या उत्तरेकडील मियावली येथील हवाई दलाच्या प्रशिक्षण हवाई तळावर नुकताच दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला. हा आत्मघातकी हल्ला होता आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देताना तीन अतिरेकी ठार झाले. तालिबानशी संबंधित असलेल्या तेहरीक ए जिहाद या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यापूर्वी बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वॉंमध्ये अतिरेकी हल्ला होऊन, सतरा जणांचा मृत्यू झाला होता. आम्ही अतिरेक्यांचा कसा बिमोड केला अशी पाठ पाकिस्तानी लष्कर थोपटून घेत आहे. परंतु मुळात लष्करी प्रशिक्षण हवाई तळापर्यंत अतिरेकी पोहोचू कसे शकले, गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? हे प्रश्नच आहेत. अलीकडेच डेरा अली खान आणि ग्वादार येथे झालेल्या हल्ल्यात 17 पाकिस्तानी जवान ठार झाले होते. तसेच आणखी एका हल्ल्यात पाच नागरिकांचा बळी गेला. भारतात सतत अतिरेकी घुसवून येथील शांततेचा भंग करण्यात आनंद मानणाऱ्या पाकिस्तानला, सातत्याने दहशतवादाशी सामना करावा लागत आहे.
पाकिस्तानच्या चार पैकी तीन प्रांतांमध्ये नोव्हेंबर महिन्यात भयंकर हल्ले झालेले आहेत. खैबर पख्तूनख्वॉं किंवा अफगाणिस्तान सीमाभागात पाक लष्कराने चढाई केली की, तेहरीक ए तालिबान ही संघटना पाकिस्तानच्या तळांवर त्याचा बदला म्हणून हल्ला करते. पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना सतत लक्ष्य करते, हे दिसून आले आहे. मुळात पाकिस्तानचे राजकारण हेच रक्तरंजित असून, अतिरेकी संघटना या राजकीय प्रक्रियेचा भाग बनले आहेत. भारतविरोधी दहशतवादी खेळ करताना आता पाकिस्तानचाच खेळखंडोबा होऊ लागला आहे. पाकिस्तानच्या पायदळ अथवा हवाई दलाच्या ताकदीशी आम्ही मुकाबला करू शकतो, हे तेथील अतिरेक्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. 2017 मध्ये पाकिस्तानी लष्कराने रद उल फसाद ही दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर अतिरेक्यांनी लष्करास तोडीस तोड उत्तर देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानमधील पंजाबसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागातही आम्ही धुमाकूळ घालू शकतो, हेच अतिरेक्यांनी दाखवून दिले आहे. 2009 मध्ये टीटीपीने लष्करी मुख्यालयावरच हल्ला केला होता.
2011 मध्ये मेहरण नौदल तळावर, 2012 मध्ये मिन्हास हवाई तळावर आणि 2015 मध्ये बादाबेर हवाई तळावर त्यांनी हल्ला घडवून आणला. पाकमधील 17 लाख अफगाण निर्वासितांना हाकलून देण्याचा निर्णय पाक प्रशासनाने घेतला आहे. परंतु आजही अनेक अफगाणी नेते पकिस्तानात तळ ठोकून आहे. तालिबानला अफगाणिस्तानमधील आपल्या “कार्या’चा विस्तार पाकिस्तानमध्ये करायचा आहे. आजपर्यंत पाकिस्तानने “चांगले तालिबान व वाईट तालिबान’ अशी फारकत करण्याचे चुकीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे तालिबानी अतिरेकी पाकमध्ये आतपर्यंत घुसले आहे.
तालिबानला अफगाणिस्तानात सत्ता मिळवून देण्यासाठी आम्ही मदत केली. त्याबदल्यात तुम्ही आम्हाला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)ला वेसण घालण्यासाठी साहाय्य करा, अशी पाकिस्तानची मागणी आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून, टीटीपी पाकिस्तानमध्ये हैदोस घालत आहे. आतापर्यंत या संघटनेने पाकमधील 83 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. अफगाण तालिबान्यांना आतापर्यंत पाकिस्तानने भरपूर मदत केली. परंतु हा दहशतवादी भस्मासुर पाकिस्तानवरच उलटला आहे. अल कायदाशी आम्ही संबंध तोडून टाकणार आहोत, असे आश्वासन अफगाण तालिबान्यांनी जगाला दिले होते. परंतु त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असे पाकिस्तानचेच मत बनले आहे. निदान टीटीपी या बंदी घातलेल्या संघटनेला खतम केल्यास, अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारवर जगाचा विश्वास बसू शकेल, असे पाकिस्तानला वाटते.
2014 साली पेशावरमधील लष्करी शाळेवर हल्ला करून, टीटीपीने शंभरपेक्षा जास्त लहान मुलांना ठार मारले होते. त्यानंतरही टीटीपीने अनेक बॉंबस्फोट, आत्मघातकी हल्ले यामुळे पाकला जेरीस आणले होते. आजही टीटीपीचे हिंसक उपद्व्याप सुरूच आहेत आणि त्यामुळे पाकिस्तान मेटाकुटीस आला आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असून, भिकेचा कटोरा घेऊन जागतिक अर्थसंस्थांच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा असुरक्षित बनली आहे. म्हणूनच पाकला अचानकपणे शांततेचे गीत गावेसे वाटू लागले. काबूलचा ताबा घेतल्यानंतर अफगाण तालिबान्यांनी टीटीपीचा एक संस्थापक अमीर मौलवी फकीर मुहम्मद आणि अन्य अनेक अतिरेक्यांची मुक्तता केली. टीटीपीच्या नेतृत्वाच्या दृष्टीने अफगाण तालिबान हे त्यांचे रोल मॉडेल आहेत.
या तालिबान्यांनी ज्याप्रमाणे अफगाणिस्तानवर प्रभुत्व मिळवले, तसेच वर्चस्व पाकिस्तानवर मिळवावे, त्यासाठी आरपार की जंग छेडावी लागली तरी बेहतर, असे टीटीपीचे धोरण आहे. टीटीपीने सातत्याने हिंसाचार घडवला असूनही, अफगाणिस्तानात हक्कानी नेटवर्क हे सत्तेत आहे. अशावेळी अफगाणिस्तान व पाकिस्तानने दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी होईल, असे ठरवले होते. तरीदेखील टीटीपीने युद्धविरामाचा भंग करण्याचे जाहीर केले. पाकिस्तानच्या कैदेतील 102 अतिरेक्यांची पाक सरकारने सुटका केली नाही आणि आश्वासनाचा भंग केला, असे टीटीपीचे म्हणणे होते. खरे तर, अफगाण तालिबान आणि हक्कानी यांनी मिळून टीटीपीचा बंदोबस्त केला पाहिजे. टीटीपीला मिळणारी आर्थिक मदत पूर्णतः थांबवली पाहिजे असे पाकला वाटत असूनही, ही इच्छा फलद्रूप झालेली नाही. पंजाबी जिहादी गट, अल कायदा, बलुच आणि सिंधी राष्ट्रवादी योद्धे तसेच पाकिस्तानातील गुंड टोळ्या यांच्याशी टीटीपीने हातमिळवणी केली आहे, एवढेच नव्हे, तर दाएश (इस्लामी स्टेट इन इराक अँड सीरिया-आयसिस) किंवा आयएसकेपी या दहशतवाद्यांशीही टीटीपीची दोस्ती आहे.
24 जून 2007 रोजी लाल मशिदीत आश्रय घेतलेल्या अतिरेकी गटांनी इस्लामाबादमधील सात चिनी नागरिक आणि दोन पाकिस्तानी पोलिसांचे अपहरण केले. चिनी लोकांच्या सुटकेसाठी पाक सरकारने शर्थीचे प्रयत्न करावेत यासाठी चीनने त्यावेळी दबाव आणला होता. तेव्हा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी लाल मशिदीला घेराव घातला आणि आत घुसून शंभर अतिरक्यांना ठार मारले. शेकडो अतिरेकी शरण आले आणि त्यात काही बुरखाधारी महिलाही होत्या. पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या प्रासादाच्या अगदी जवळ घडलेली ही घटना. ऑपरेशन सायलेन्स अंतर्गत ही मोहीम फत्ते करण्यात आली, तेव्हा संतापलेल्या अतिरेक्यांनी मुख्यतः पश्तुन वर्चस्वाखालील वायव्य पाकिस्तानात अनेक बॉंबस्फोट घडवले, तसेच आत्मघातकी हल्लेही करण्यात आले. दक्षिण वजिरिस्तान आणि स्वात जिल्ह्यात अतिरेकी अधिक संघटित झाले आणि त्यांनी शरियाची कठोरपणे अंमलबजावणी सुरू केली. लाल मशीद घटनेचा परिणाम म्हणजे, बैतुल्ला महसूदच्या नेतृत्वाखाली 2007 अखेर टीटीपीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लगेचच हाफिझ गुल बहादूर गटाने जवळपास सुरक्षा दलाच्या सातशे सैनिकांना ठार मारले. टीटीपीने लगोलग अल कायदा, अफगाण तालिबान तसेच आयसिसशी संगनमत करण्यास सुरुवात केली.