– हेमंत महाजन
भारतातून परदेशात अवैध स्थलांतर रोखण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने कायदेशीर स्थलांतराला चालना देण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत आणि लवकरच त्यांची अंमलबजावणी देखील केली जाईल.
दुबईहून निकाराग्वाला जाणारे विमान 21 डिसेंबरला मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आले होते. विमानात प्रवास करणारे 303 भारतीय प्रवासी भारतातून बेकायदेशीरपणे प्रवास करत असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांना मिळाली होती. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन यांसारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये अवैध स्थलांतर होते. लोक काहीवेळा बेकायदेशीर प्रवास करून आपला जीव धोक्यात घालतात. ते पकडले जाण्याचा, तुरुंगात जाण्याचा आणि नंतर हद्दपार होण्याचा धोका देखील पत्करतात. विमान मानवी तस्करीच्या संशयावरून 21 डिसेंबरला थांबवण्यात आले.
हे भारतीय संयुक्त अरब अमिरातीमधील कामगार होते, ज्यांना अमेरिका किंवा कॅनडामध्ये आश्रय घ्यायचा होता, म्हणून ते निकाराग्वाला जात होते. फ्रेंच अधिकारी इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 27 प्रवासी अद्याप फ्रान्समध्ये आहेत. अनेक भारतीय अलीकडच्या काळात बेकायदेशीर स्थलांतर करत आहे. ‘चांगल्या आयुष्यासाठी’ लोक ‘एजंट’ना पैसे देतात, जे सीमा ओलांडण्यास मदत करतात. अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशासाठी मेक्सिको आणि निकाराग्वा यांसारख्या मध्य अमेरिकन देशांतील मार्गांचा वापर केला जातो.
निकाराग्वा हे युनायटेड स्टेट्समधील आश्रय शोधणार्यांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. वृत्तपत्राच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या काळात, बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना तब्बल 96,917 भारतीयांना अटक करण्यात आली. 2019-20 मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करताना पकडल्या गेलेल्या भारतीयांची संख्या 19,882 होती तर 2021-22 मध्ये अशा पद्धतीने पकडल्या गेलेल्या भारतीयांची आकडेवारी 63,927 होती. अमेरिकेचा डेटा दर्शवितो की त्यापैकी किमान 41,770 भारतीयांनी मेक्सिकन भू सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक भारतीयांनी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केला.
पंजाब आणि उत्तरेतील अनेक राज्यांतून मोठ्या प्रमाणात परदेशात अवैधरित्या स्थलांतर वाढले आहे. परदेशात अवैध पद्धतीने घुसखोरी करण्यासाठी जागतिक पातळीवर एक संज्ञा वापरली जाते, ज्याला डाँकी फ्लाइट्स म्हणतात. जगभरातील अनेक लोक युनायटेड किंग्डम, कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश करण्यासाठी अवैध मार्गांचा वापर करतात. युरोपियन युनियनमधील देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना पर्यटन व्हिसा मिळतो. मागच्या वर्षीपर्यंत ज्या लोकांना पश्चिम युरोपात प्रवेश करायचा होता, ते लोक सर्बिया देशाचा व्हिसा मिळवून तिथे 30 दिवस वास्तव्य करत असत. या 30 दिवसांत ट्रॅव्हल एजंट किंवा मानवी तस्करीचा व्यवसाय करणारे, भारतीयांसाठी सर्बिया ते इटली अशा समुद्रमार्गाचे नियोजन करून देत.
परदेशात जाऊन सुंदर आयुष्य व्यतीत करण्याचे स्वप्न पाहणारे तरुण जेव्हा ट्रॅव्हल एजंटकडे जातात, तेव्हा त्यांची फसवणूक सुरू होते. अतिशय कमी दरात व्हिसा मिळवून देऊ, असे आमिष हे ट्रॅव्हल एजंट तरुणांना देतात. काही ट्रॅव्हल एजन्सी नियमानुसार नोंदणीकृत आहेत, तर काही अवैधरितीने आपला व्यवसाय चालवितात. एजंट आधी विद्यार्थी व्हिसा देण्याचे आमिष दाखवितात. जर विद्यार्थी व्हिसा नाकारला गेला तर मग अवैध मार्गाचा अवलंब केला जातो. परदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेले लोक एजंटना भरमसाठ शुल्क देतात आणि जोखमीच्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतात. ही सर्व जीवघेणी कसरत करण्यामागे कारण एकच असते. कसेही करून युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश मिळवायचा आणि त्या ठिकाणी जाऊन आपले स्वप्न पूर्ण करायचे.
जानेवारी 2022 मध्ये कॅनडातून अमेरिकेत प्रवास करणार्या एका गुजराती कुटुंबातील चार जणांचा थंडीने गोठून मृत्यू झाला होता. यामध्ये 3 आणि 11 वर्षीय दोन मुलांचा समावेश होता. अमेरिकेच्या सीमेपासून केवळ 10 मीटर अंतरावर चौघांचे मृतदेह आढळले होते.
डाँकी फ्लाइट्सचा अवैध व्यवसाय पंजाबमध्ये पसरलेला आहे. पंजाबनंतर हा अवैध व्यवसाय हरियाणा, उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांतही पसरला आहे. जादा पैसे कमावण्याची इच्छा, चांगली जीवनशैली यासाठी अनेक भारतीयांमध्ये परदेशात जाण्याची उत्कट इच्छा निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला वाटते की, परदेशात जाऊन ते जलदगतीने आणि सोप्या पद्धतीने खूप सारे पैसे कमावू शकतात. हे फक्त एक स्वप्न आहे.
युनायटेड किंग्डम, गृह खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या प्रवेश मिळवणार्यांपैकी भारतीय दुसर्या क्रमांकावर आहे. इंग्लिश खाडीमधून अतिशय छोट्या बोटीतून धोकादायक पद्धतीने प्रवास करून स्थलांतरित नागरिक प्रवेश करतात. यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात 675 भारतीय नागरिकांनी छोट्या बोटींमधून युनायटेड किंग्डममध्ये प्रवेश केला. युनायटेड किंग्डमने वर्क व्हिसावर निर्बंध लादल्यानंतर हे स्थलांतर झाले.
सर्वात प्रथम लोकांना समजण्याची गरज आहे की बेकायदेशीर रित्या स्थलांतर केले तर ते धोकेदायक असते. त्यामुळे त्यांना तुरुंगवास होऊ शकतो, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून जर परदेशात स्थलांतर करायचेच असेल तर ते फक्त कायदेशीर रित्या करा. बेकायदेशीर एजंट किंवा संस्थांचा अजिबात वापर करू नका. हा प्रचार रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियातून केला गेला पाहिजे. भारतातल्या संस्था आणि एजंट्स जे बेकायदेशीर स्थलांतराला मदत करतात, त्यांच्याविरुद्ध कठीण पोलीस कारवाईही केली पाहिजे. त्यांना अतिशय मोठी शिक्षा दिली जावी. जर असे एजंट परदेशातून भारतीयांना मदत करीत असतील तर त्या त्या देशाशी मिलाप करून अशा एजंट्सना पकडले पाहिजे आणि त्यांना शिक्षा दिली पाहिजे. आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन अशा प्रकारचे भारतीयांचे बेकायदेशीर स्थलांतर नक्कीच थांबवले पाहिजे