मुंबई – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे याचं गेल्या महिन्यात पुण्यात निधन झाले. त्यांच्या अस्थी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील दोघांना ताब्यात घेतलं.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी किल्ले रायगडावर घेऊन दोघे जण आले होते. हे दोघेही पुण्यातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोघांनी राखसदृश्य वस्तू आणि पुस्तकाची पूजा करताना छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर दिसून आले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या काही शिवप्रेमींनी त्यांना विरोध केला. त्यानंतर महाड तालुका पोलिसांनी तिथं हस्तक्षेप केला.
पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी किल्ल्यावर टाकण्याची मागणी काहींनी केली होती. मात्र याला शिवप्रेमींनी विरोध केला होता. मात्र तोच प्रकार घडल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त कऱण्यात येत आहे.
दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं.या दोघांनी जेवनाच्या डब्ब्यात अस्थी आणल्या होत्या, असंही सांगण्यात येत. पोलिसांनी या दोघांकडून वस्तू आणि इतर मुद्देमाल ताब्यात घेतला असून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद महाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.