चेन्नई :- आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचा आज (शुक्रवार) दुसरा उपांत्य सामना भारत व जपान यांच्यात होत आहे. या सामन्यात यजमान भारतीय संघाचे पारडे जड मानले जात असले तरीही साखळी फेरीतील सामन्यात जपानने कडवी लढत देत भारतीय संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले होते, त्यामुळे या सामन्यातही जपानचा संघ भारतासमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतो.
या स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल अत्यंत धडाकेबाज पद्धतीने सुरू आहे. पहिल्याच लढती भारतीय संघाने चीनचा 7-2 असा तर मलेशियाचा 5-0 असा पराभव केला होता. तसेच त्यांना जपानशी 1-1 अशा बरोबरीवर जरी समाधान मानावे लागले असले तरीही त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करत थाटात उपांत्य फेरी गाठली.
दुसरीकडे जपानने स्पर्धेत चीनचा पराभव केला तर एका लढतीत पराभवाचाही सामना केला. त्यानंतरच्या दोन लढतीही बरोबरीत राहिल्या. मात्र, या सगळ्या सामन्यांत जपानचा बचाव अत्यंत भक्कम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाही.
पहिल्या हाफमधील दोन्ही सत्रे अत्यंत महत्वाची असून आतापर्यंतच्या सामन्यात भारतीय संघाने याच दोन सत्रात सर्वाधिक गोल करत समोरच्या संघाला दबावाखाली राखले होते व विजय मिळवले होते. हीच करामत त्यांना आज जपानविरुद्धही करावी लागेल. भारताची सर्व मदार प्रामुख्याने कर्णधार हरमनप्रीत सिंगसह आकाशदीप, मनदीप सिंग, कीर्ती व जुगराज सिंग यांच्यावरच अवलंबून आहे.
मलेशिया-कोरिया पहिली उपांत्य लढत…
भारत व जपान यांच्यातील दुसरी उपांत्य लढत सुरू होण्यापूर्वी मलेशियाचा पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाशी सामना होणार आहे. अर्थातच भारतीय संघाप्रमाणे मलेशियाचाही संघ अफलातून खेळ करत असल्याने या लढतीत मलेशियाच संभाव्य विजेते असल्याचेही मानले जात आहे. यंदाच्या स्पर्धेत कोरियाची कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरीही ते मलेशियाला चकित करू शकतात.