पाल्लेकेले :- भारतीय संघात दिग्गज फलंदाजांचा व गोलंदाजांचा ताफा असला तरीही नेपाळ संघाला कमी लेखून चालणार नाही. या दोन संघात आशिया करंडक स्पर्धेचा साखळीतील अखेरचा सामना आज रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसाने वाया गेल्यामुळे सुपर फोर गटात स्थान मिळवण्यासाठी या लढतीत विजय मिळवणे भारतीय संघासाठी अनिवार्य बनले आहे.
भारत विरूध्द नेपाळ यांच्यातील सामन्यास 3 वाजता सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (TOSS) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजीचा निर्णय घेत नेपाळ संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली. भारतीय संघाने 266 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरु होऊ शकला नाही. मात्र, त्यांनी नेपाळविरुद्ध विजय मिळवला असल्याने भारताविरुद्धच्या सामन्यातील गुणांसह त्यांनी सुपर फोर गटात प्रवेश केला आहे.
नेपाळने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत पराभव पत्करला असला तरीही त्यांनी गोलंदाजीत दाखवलेली चमक पाहता भारताच्या नवोदित फलंदाजांना जास्त सावध फलंदाजी करावी लागणार आहे.