लक्ष्मण माने; शासनाने रेशनवरील धान्य पुरवठा बंद केल्याचा निषेध
सातारा – राज्यातील अनुदानित आश्रमशाळांना गेल्या 25 वर्षांपासून बीपीएल व नारी निकेतन योजनेतून करण्यात येणारा रेशनिंगवरील धान्य पुरवठा ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतील विद्यार्थी व शिक्षक उद्या, दि. 18 रोजी जिल्हाधिकरी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
माने म्हणाले, राज्यातील अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहांना गेल्या 25 वर्षांपासून राज्य शासनाकडून बीपीएल व नारी निकेतन योजनेतून गहू व तांदूळ यांचा रेशनिंगच्या दरात पुरवठा होत होता. केंद्र शासनाने कल्याणकारी संस्था व वसतिगृहे या योजनेंतर्गत फक्त शासनाच्या आश्रमशाळा व वसतिगृहांना धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतल्याने अनुदानित संस्थांच्या आश्रमशाळांचा धान्य पुरवठा ऑगस्टपासून बंद झाला आहे.
भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेत एक हजार गरीब, निराधार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाकडून एका विद्यार्थ्यामागे 900 रुपये अनुदान देण्यात येते. शासनाने धान्य वितरण बंद केल्याने अनेक आश्रमशाळा, वसतिगृहे अडचणीत आली आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सद्य स्थिती सांगितली. मात्र, शासन निर्णय असल्याने आपण काहीही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना नाश्ता व दोन वेळचे जेवण देण्यात अडचणी येत असून शासनाने पूर्वीप्रमाणे धान्य वितरण सुरू करावे.
आश्रमशाळा, वसतिगृहांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संस्थेतील इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थी व शिक्षक उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार आहेत. धान्य पुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत आश्रमवासी विद्यार्थी गटागटाने शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारात जाऊन धरणे आंदोलन करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे व मंत्र्यांना निवेदन पाठवले आहे, असे माने यांनी सांगितले.