वसुलीसाठी वायरमन तत्पर..
शिवारात विजेसंदर्भातील काही अडचण शेतकऱ्याला निर्माण होईल, त्यावेळी संबंधित वायरमनला बोलावूनही तो वेळेत यत नाही. मात्र विजबील वसूली करायची असेल, तेंव्हा मात्र हेच वायरमन तत्परतेने शेतकऱ्यांच्या दारात जात असतात. वसुलीसाठी तत्परता दाखवण्याऱ्या या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सुध्दा अशीच तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
कराड – हणबरवाडी, ता. कराड येथील आरफळ कालव्यानजीक असणाऱ्या चार, पिंपळाच्या पटीतील एक, स्मशानभूमी जवळील एक अशा एकूण सहा डीपींमधील फ्युजाच गायब झाल्याने शिवारातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना वायरमनची वाट पहावी लागत आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी वेळापत्रक बनवण्यात आले आहे. आठवड्यातील तीन दिवस दिवसा वीजपुरवठा सुरु असतो. तर तीन दिवस रात्री वीजपुरवठा सुरु असतो.
दिवसा वीजपुरवठा खंडित झाला तर वायरमन उपलब्ध होतात पण त्यासाठी सुध्दा शेतकऱ्यांना तास्नतास वायरमनची वाट पाहत बसावे लागते. तसेच शेतीचा वीजपुरवठा रात्री असेल तेंव्हा विहिरीत व आरफळ कालव्याला पाणी असूनही विजेअभावी शेतीला पाणी देणे शक्य होत नाही.
ही वस्तूस्थिती कोणीही नाकारु शकत नाही. यावर्षी पावसाळ्यात दमदार पाऊस झाला आहे. तर परतीच्या पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावल्याने नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत पिकांना पाण्याची गरज भासली नाही. मात्र गेल्या तीन आठवड्यापासून शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र या भागात वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतकरी चांगलाच वैतागला आहेत.