मुंबई – ड्रग्ज प्रकरणात हजेरी लावण्याच्या प्रक्रियेतून सुटका मिळवण्यासाठी शाहरूख खानचा मुलगा आर्यन याने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता त्याला जामीन देताना घालून दिलेल्या अटींमध्ये शिथिलता हवी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दर शुक्रवारी न्यायालयात हजेरी लावण्यापासून आर्यन खानला सुटका हवी आहे. यासाठी आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार सुटका झाल्यापासून आर्यन खान दर शुक्रवारी एनसीबी मुंबईच्या कार्यालयात हजेरी लावत आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना आर्यन खानने एनसीबी कार्यालयाबाहेर होणाऱ्या गर्दीचं कारण दिलं आहे. जेव्हा आर्यन खान कार्यालयाजवळ पोहोचतो, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर माध्यमे हजर असतात.
बघ्यांची देखील गर्दी होते. यावेळी पोलिसांना त्याला गर्दीतून वाट काढत कार्यालयात आणि नंतर कार्यालयातून बाहेर काढावे लागते, असं आर्यनच्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.