वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – सातारा लोणंद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे या रस्त्यावरील देऊर, ता. कोरेगाव येथील रेल्वे गेट क्रमांक ४७ या ठिकाणी रेल्वे गेट लागल्यानंतर रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला रांगा लागून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची गरज आहे.
सातारा लोणंद हा रस्ता दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर या विभागाने या रस्त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी केल्याने या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. तसेच पुणे बेंगलोर हायवेवरील टोल चुकविण्यासाठी अवजड वाहन या रस्त्याचा वापर करत आहेत. यामुळे लोणंद सातारा राष्ट्रीय मार्गावर सतत वर्दळ असते याच मार्गावर देऊर येथे असलेले रेल्वे गेट क्रमांक ४७ हे दिवसातून ३० ते ३५ वेळा बंद होते.
यावेळी या गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सध्या रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून थोड्याच दिवसात या ठिकाणी रेल्वेचा दुहेरी मार्ग चालू होणार आहे.
हा मार्ग चालू झाल्यानंतर रेल्वेच्या फेऱ्या वाढणार असल्याने येथील रेल्वे गेटचा प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागणार आहे. सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी पर्यायी मार्गाची सोय करावी अशी मागणी येथील वाहनधारकांकडून होत आहे.
चौकट: रेल्वे लाईनच्या लगत पश्चिम बाजूस देऊर गेट ते काळीमोरी असा उड्डाण पुलापेक्षा कमी खर्चामध्ये रस्ता होण्यासारखी जागा असून याठिकाणी रस्ता झाल्यास शासनाचा खर्च कमी होणार असून वाहनधारकांची ही वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. राहुल कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य)