मुंबई – राज्यातील बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्याची सुचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाला केली आहे. दर पंधरवड्याला या शोधाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याची सुचनाहीं त्यांनी केली आहे.
यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यातील 3594 महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी काहींचा शोध लागला आहे. राज्यातून महिला व मुली बेपत्ता होत आहेत, ही गंभीर बाब असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (महिला व बाल गुन्हे प्रतिबंध) दीपक पांडे, राज्याच्या गृह विभागाचे सहाय्यक सचिव राहुल कुलकर्णी,
एमएससीडब्ल्यूच्या उपाध्यक्षा दीपा ठाकूर आणि कायदेतज्ज्ञ वीरेंद्र नेवे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.भरोसा सेल आणि मिसिंग सेल केवळ कागदावरच कार्यरत असल्याचे त्या म्हणाल्या.राज्यातून महिला व मुली बेपत्ता होत आहेत, ही गंभीर बाब आहे.
बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांमध्ये 16 ते 35 वयोगटातील महिलांचा मोठा समावेश असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील 82 कुटुंबातील महिला परदेशात गेल्या असून त्यांचा आता शोध लागत नाही. त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.