मुंबई – फोर्ब्जच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील अब्जाधीश भारतीय उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी नुकतीच सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करून आपण कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी किंवा भाषणासाठी जाण्यापूर्वी दही-साखर खातो, असे सांगितले होते. दही-साखर खाणे ही माझी जुनी सवय असून ती नेहमी माझ्यासाठी सुदैवी ठरते असे त्यांनी म्हटले होते. लहानपणी आईने मला हे शिकवले. कुठल्याही कामासाठी जाताना ती हातावर दही-साखर देत असे. त्यामुळे माझ्यासाठी ही केवळ एक सवय नसून आईचा आशीर्वाद आहे असे त्यांनी म्हटले आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशात आजही महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीच्या मुलाखतीसाठी, परिक्षेला जाताना हातावर दही-साखर देण्याची पद्धत आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही प्रथा अजूनही पाळली जाते. अर्थात यामागे काही कारणे आहेत. दही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने पचनसंस्था तर चांगली राहतेच; पण पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. तसंच पोट थंड ठेवण्यास मदत होते. याशिवाय, दही आणि साखर खाल्ल्यानं शरीरात भरपूर ऊर्जा राहते. दही हा परिपूर्ण आहार म्हटला जातो. कारण दह्यासोबत खाल्लेले कोणतेही अन्न सहज पचते. त्याचवेळी साखर शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते. अशावेळी जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळून सेवन करता तेव्हा दुप्पट फायदा होतो. हे मिश्रण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
दह्यात साखर घालून त्याचं सेवन केल्याने आपल्या शरीराला लगेच ग्लुकोज मिळतं. त्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा भरलेली राहते. दही-साखर खाल्ल्याने मानसिक शांतीही मिळते. त्यामुळे आपलं कार्य सहज यशस्वी होतं. जर आपण उर्जेने परिपूर्ण असाल तर आपण आपले कार्य सकारात्मक उर्जेने करू, ज्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. यामुळे घरातील वडिलधारी मंडळी बाहेर जाण्यापूर्वी दही-साखर खायला देतात.
आयुर्वेदानुसार, दही त्याच्या स्वभावामुळे ‘कफ-वर्धक’ म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात शरीर थंड आणि शांत ठेवण्यासाठी ते साखरेत मिसळून खाण्याचा सल्ला दिला जातो. हे मिश्रण शरीरातील तणाव आणि थकवा कमी करण्यास देखील मदत करते, याचे एकत्र सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील सुधारते.
कोण आहेत अनिल अग्रवाल
अनिल अग्रवाल यांचा जन्म पाटणा येथे झाला. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी शाळा सोडून वडिलांना अल्युमिनियम कंडक्टर बनवण्याच्या कामात मदत करायला सुरवात केली. पुढे छोट्या शहरातील असंख्य तरुणांच्या मनात मोठे करिअर करण्याची सुप्त इच्छा असते त्यानुसार ते करिअरच्या शोधात वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत आले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी अनिल अग्रवाल यांनी पाटणा शहरातील आपलं घर आणि कुटुंब सोडलं आणि स्वप्नांची नगरी मुंबईत आले. तेव्हा त्यांच्याकडे एक जेवणाचा बॉक्स आणि बेडिंगशिवाय दुसरे काहीही नव्हते. मुंबईत २१ रुपयांच्या भाड्याच्या खोलीत ते राहिले, जो त्यांनी इतर सात लोकांसह सामायिक केला. त्यांनी ८ बाय ९ फूट क्षेत्रफळाच्या खोलीत आपले कार्यालय (ऑफिस) उघडले. तेथून त्यांनी भंगार धातूची खरेदी-विक्री सुरू केली. त्यांनी मुंबईत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेली समशेर स्टर्लिंग कॉर्पोरेशन ही तांब्याची कंपनी त्यांनी प्रथम विकत घेतली. १९७० मध्ये त्यांनी ही कंपनी विकत घेण्यासाठी १६ लाख रुपये उभे केले, जी त्यावेळी खूप मोठी रक्कम होती. आपल्या मित्रांनी, कुटुंबीयांनी आणि स्वतःच्या बचतीतून जमा केलेल्या पैशातून त्यांनी ही कंपनी विकत घेतली. पण असे असूनही त्यांनी पुढील १० वर्षे भंगार धातूच्या व्यापाराचा व्यवसाय सुरू ठेवला, जो त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता. आज ते धातू, तेल आणि वायूच्या व्यवसायात आहेत तसेच सेमी कंडक्टर निर्मितीच्या व्यवसायातही उतरले आहेत. आज त्यांच्या वेदांता समूहाची हजारो कोटींची उलाढाल आहे.