पुणे -मिळकतधारकांनी नियमित मिळकतकर भरावा यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने राबवलेल्या “पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना’ तब्बल पाच महिने खंडित झाली आहे. विशेष म्हणजे या पाच महिन्यांच्या कालावधीत एकाही मिळकतधारक अथवा त्याच्या कुटुंबीयांनी या योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरही उदासीनता दिसून येत आहे.
महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या अंदाजपत्रकामध्ये “पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना’ मांडली. 2018-19 या आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. मिळकतकराचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेअंतर्गत पाच लाखांचे अर्थसाह्य मिळेल, असा यामागील उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत महापालिकेने करआकारणी झालेल्या मिळकतधारकांचा ग्रुप विमा काढण्यात येत असून, दरवर्षी सहा ते सात कोटी रुपये विमा कंपनीला भरण्यात येतात. या योजनेच्या दुसऱ्या वर्षी मिळकतधारकासोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश करण्यात आला असून, अपघातात जायबंदी झाल्यास ऍम्ब्युलन्सच्या खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, दरवर्षी जाहिरात काढून विमा कंपनीची नियुक्ती करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये 24 सप्टेंबर 2021 मध्येच कंपनीची मुदत संपली आहे. परंतु, त्यानंतर निविदा काढून विमा कंपनीची नियुक्ती करणे अपेक्षित असताना ती अद्यापही करण्यात आलेली नाही. तब्बल पाच महिन्यांनंतर या कालावधीतील मिळकतधारकांना या योजनेचा कुठलाही लाभ देण्याला विमा कंपनी तयार होणार नाही. यामध्ये अंतिमत: नुकसान मिळकतधारकांचेच होणार आहे.
पंडित दीनदयाळ अपघात विमा योजनेचे अर्ज महापालिकेकडेच येणे अपेक्षित आहे. मागील पाच महिन्यांत किती अर्ज आले याची माहिती घेण्यात येईल. योजनेसाठी विमा कंपनी नियुक्तीची निविदा मंजूर करण्यात आली असून, लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येईल. – डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका