पिंपरी, (प्रतिनिधी) – उन्हाची तीव्रता वाढत असताना, पाण्याची समस्या उग्र रुप धारण करु लागली आहे. तर आजमितीस मावळ तालुक्यातील तीनपैकी दोन धरणांमधील पाणीसाठा निम्म्यापेक्षा अधिक आहे. मात्र ही सर्व जलाशये लघु प्रकल्पांतर्गत येत असल्याने, नागरिकांना पुढील दोन ते अडीच महिने पाणी जपून वापरावे लागणार आहे.
उन्हाळा तीव्र होत असताना धरणांमधील पाणसाठ्याच्या बाष्पीभवनाचा वेगदेखील वाढला आहे. पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविण्यासाठी पवना धरणातून दररोज पाणी रावेत बंधार्यापर्यंत सोडले जात आहे.
आजमितीस वडिवळे धरणात सर्वाधिक 59.66 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याखालोखाल आंद्रा धरणामध्ये 52.58 टक्के पाणसाठा उपलब्ध आहे. तर पिंपरी-चिंचवडकर, मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणाचा पाणीसाठा 43.28 टक्क्यांवर आला आहे.
शहरवासीयांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून 510, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून 70 आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) 15 असे 595 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.
पिंपरी-चिंचवडकर मागील चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. तर 2025 पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या तक्कारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. काही दिवसांसाठी सुरू केलेला असा पाणीपुरवठा साडे चार वर्षे झाले, तरी कायम आहे.
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ
उन्हाळा सुरू होताच पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागांतून कमी दाबाने, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर उपाययोजना करत असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.