मुंबई – शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेताहेत. शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. अशात औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रे दरम्यान आता अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. या यात्रेत आता जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रे दरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी शुरु झाल्याने हा वाद झाला होता. यादरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक ही झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
औरंगाबामधील महालगावातमध्ये शिवसंवाद यात्रा सुरु होती त्यावेळी त्याच ठिकाणी माता रमाई यांची जयंती असल्यामुळे मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी हा प्रकार घडल्याचे समोर आले. सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.