– अरुण गोखले
असाच एक सत्संगाचा कार्यक्रम संपला आणि एकेक करून सारेजण महाराजांना नमस्कार करून आपापल्या घरी परतू लागले. सर्वात शेवटी एक व्यक्ती महाराजांच्या दर्शनासाठी पुढे आली आणि महाराजांच्या समोर बसली. त्यांनी मोठ्या आस्थेने त्या व्यक्तीची चौकशी करत विचारले, “”काय रे बाबा! तू इतका दमलेला, थकलेला, कसल्या तरी भाराने वाकलेला असा का दिसतो आहेस? काय झाले?”
त्यावर काहीशा अदबीने ती व्यक्ती म्हणाली, “”महाराज! काय सांगू सध्या हे असं मला आपण कसल्याशा तरी भाराने वाकल्यासारखे, दबल्यासारखे, ओझ्या खाली आल्यासारखे वाटते आहे?” “”का तुला काही अडचण आहे का? काही त्रास आहे का? काही दुखतंय खुपतंय का?” महाराजांनी आस्थेने विचारले.
त्यावर ती व्यक्ती म्हणाली, “”नाही महाराज, तसं तर काहीच कारण नाही. उलट मागे मी तुमच्याकडे आलो होतो त्यापेक्षा आता तर मी फार चांगल्या स्थितीत आहे. माझ्याकडे घरदार आहे, गाडी आहे, गाठीला बऱ्यापैकी पुंजी आहे. बरं! माझी मुलंबाळं पण चांगली आहेत. सारं नीटनेटकं असूनही मी मात्र हा असा दबलेला, थकलेला, उदास आणि उदासीन जीवन जगतो आहे? याचं कारण काय?”
महाराजांनी एकवार त्याच्याकडे आपली नजर रोखून पाहिलं आणि ते म्हणाले, “”बाबारे! तुझ्या या स्थितीच कारण आहे, तुझ्या डोक्यावरचे ओझे. ते ओझे आहे मी पणाचे, अहंकाराचे, अहं कर्तृत्वाचे. बाबारे, तुला असं वाटत आहे की तू जे काही कमवलं आहेस, मिळवलं आहेस, ते तुझ्या शक्ती, सामर्थ्य आणि बुद्धीच्या बळावर. पण बाबारे! तुझ्या या कर्तृत्वाचा कर्ता तू नाही तर तो आहे, तो परमात्मा. जो तुझ्या आत बसला आहे. हा सारा खेळ त्याचा आहे. ही सारी मिळकत त्याची आहे. तू फक्त निमित्य मात्र आहेस.
तेव्हा आता एकच कर की आता हा अहंपणाचा, मी कर्तेपणाचा भार हा त्याच्यावर घाल आणि तू मोकळा हो. बाबारे, त्याच्यावर सारा भार घातला की मग आपल्या माथ्यावर काही ओझं राहात नाही. सुखे जीवनाची हीच गुरूकिल्ली आहे. मग काय त्या व्यक्तीने तिथेच आपला तो सारा भार देवावर घातला आणि तो अगदी मोकळा झाला. एक वेगळंच समाधानाचं हसू त्याच्या गालावर फुलले.