– अरुण गोखले
नाथपंथीय सिद्ध योगी बाबा हरीनाथजी यांचे एक वचन आहे. ते आपल्याकडे येणाऱ्या भक्त भाविकांना, प्रापंचिकांना नेहमी हेच म्हणत की- “मत कर चिंता चिंतन करले। चिंता से क्या होना है?’ म्हणजे काय तर बाबा रे! तू चिंतेचे चिंतन न करता त्या एका ईश्वराचे चिंतन कर. तुझ्या सर्व चिंता तो एक भगवंतच दूर करेल. कारण, या मानवी जीवनात ज्याला चिंता नाही असा एकही जीव आपल्याला शोधूनही सापडणार नाही. कारण, आजचं झालं तर उद्याचं काय? उद्याचं भागलं तर परवाचं काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या जीवनात भस्मासुरासारखा उभा आहेच. जे नाही ते कसे मिळवावं, याचा विचार म्हणजे चिंता.
या चिंतेची कारणेही व्यक्ती-व्यक्तीरूप भिन्न-भिन्न असतात. कुणाला पैशाची, घरादाराची, नोकरी-पाण्याची, आरोग्याची, शिक्षणाची, पोराबाळाच्या लग्नकार्याची चिंता किंवा काळजी ही असतेच. त्यामुळे जीवनात येणारे नैराश्य, दु:ख, यातना, क्लेश हे प्रत्येकालाच पीडा देत असतात. त्याचा परिणाम काय होतो हे संत कबीरदासांनी त्यांच्या एका मार्मिक दोह्यात फार उत्तम प्रकारे सांगितलेले आहे. ते म्हणतात-
चिंता से चतुराई घट। दुख से घटे शरीर।
आशा मनिषा ना मिटे, कह गये दास कबीर।। या दोह्यात कबीरदासजी म्हणतात की- बाबानो! चिंता करून काय होणार आहे! उलट या चिंतेच्या रोगाने तुम्ही जर पछाडला गेलात तर तुमची चतुुराई म्हणजेच तुमचे शहाणपण, विवेक, सद्सद्बुद्धी यावरील ताबा सुटेल. तुमचे शरीर चिंतेच्या रोगाने ग्रासले जाईल. तुमचे मानसिक संतुलन ढळेल. तु
म्ही निराश निष्क्रिय आणि तुम्ही प्रसंगी आत्मघातकी व्हाल. तेव्हा ही चिंता करणे सोडा आणि त्या रामाचे चिंतन करा. चिंतनाच्या अभ्यासाने तुमची मनोशक्ती बळावेल. तुम्हास धैर्य, सहनशीलता, प्रतिकारशक्ती वाढेल. आपली कोणीतरी चिंता करणारा आहे, हा विश्वास तुम्हास जगण्याचे बळ देईल. तुम्ही चिंतेची चिंता करण्यापेक्षा तुमची चिंता त्या ईश्वराच्या पायावर घाला आणि तुम्ही निश्चिंत व्हा. मनात विश्वास बाळगा की तुमची काळजी तुमच्यापेक्षा त्याला जास्त आहे. चिंता करून जीवनाची माती न करता चिंतनाची कास धरा आणि तो रघुपती आपलासा करा. तो एकदा का तुमचा झाला की तुमच्या सर्व चिंता आपोआप दूर होतील.