अरुण गोखले
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज किंवा वै. ह. भ. प. दादामहाराज सातारकर या संतांनी, सत्पुरुषांनी, सद्गुरूंनी तू मला “तूप’ दे अशीच मागणी केली आहे. त्या संदर्भातला तुकोबारायांचा “सद्गुरू राये कृपा मज केली। परि नाही घडली सेवा काही।। भोजना मागती तूप पावशेर। केला अंगिकार सवे माझा।।’ हा त्यांच्या स्वप्नातील गुरू भेटीचा आणि त्या तुपाच्या मागणीचा अनुभूतीजन्य अभंग.
या संत आणि सत्पुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करायला लागलो, तर या तुपाच्या मागणीचा नेमका अर्थ काय? ही अशी तुपाचीच मागणी का केली जाते. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आणि त्या मागचे मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या संदर्भात पू. दादा महाराज सातारकर यांच्या जीवनातला एक प्रसंग आणि त्याचा त्यांनी जो गुढार्थ सांगितला जातो तो असा की-
पू. दादा महाराजांच्याकडेही त्यांच्या साधकीय अवस्थेच्या काळात काशीहून आलेल्या एका साधू माहात्म्याने अशीच तुपाची मागणी केली होती. तुकाराम महाराजांप्रमाणे त्यांचीही ती मागणी देण्याचे राहूनच गेले. आपल्याकडे त्या महात्म्याने अन्य कशाचीच मागणी न करता ती तूपाचीच मागणी का केली? या मागणी मागचे गूढ काय? याचा विचार करीत असताना त्यांना मारुती मंदिरातील त्याच्या विचार, मनन, चिंतन यातून त्या तुपाच्या मागणीचा त्यांना जो नेमका गुढार्थ आढळला तो असा की-
तूप ही खरं तर लौकिक व्यवहारातील एका साध्या स्निग्ध पदार्थाची मागणी आहे. तूप ही दुधाची पूर्णत्वास पोहोचलेली अवस्था आहे. त्या तुपातच दूध, दही, ताक, लोणी आणि तूप या सर्व अवस्था एकत्वाने सामावलेल्या आहेत. त्या प्रमाणे परमार्थात देव आणि भक्त यांच्यातील भेदाभेदाची भावना पूर्णत्वाने लोप पावणे. “मी’ “तू’ पणाची बोळवण होऊन देवा “तू’ आणि मी “प’रका नाही, आपण एकच आहोत,
हे अभेदतत्त्व तयार होणे हेच ते “तूप’ आहे. देव आणि भक्त यांच्यातील भिन्नत्वाचा लय आणि आपण दोघे एकच या अनुभूतीचा प्रत्यय हेच त्या “तुपा’च्या मागणी मागचे गूढ आहे. द्वैत निमालेल्या शिष्याच्या या अवस्थेचीच सद्गुरूंना सत्पुरुषांना त्यातले अभिन्नत्व भावनेची नितांत गरज असते. ही समजावे यासाठीच असते ती तुपाची मागणी.