पवननगर, (वार्ताहर) – प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठत कोथुर्णे येथील शेतकरी कुटुंबातील हर्षदा भाऊ दळवी हिने महाराष्ट्र महसुल विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळविले असून तिची नुकतीच ग्रामविकास अधिकारी, जळगाव (तलाठी) म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असून मला पोलीस उपनिरिक्षक होऊन माझे व माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तसेच माझ्या गावाचे, माझ्या भागाचे व माझ्या तालुक्याचे नाव मोठे करून देशसेवा करायची आहे, असे हर्षदाने सांगितले.
महाराष्ट्र महसुल विभागातर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत हर्षदाने २०० पैकी १७६ गुण संपादन करत तिने तलाठी पद मिळवले आहे. हर्षदा मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील कोथूर्णे गावातील असून ती सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे.
हर्षदाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथूर्णे येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण वारू कोथूर्णे माध्यमिक विद्यालय येथे झाले. उच्च शिक्षण लोणावळा येथे झाले. स्पर्धा परीक्षेसाठी तीला हनुमंत हांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तर हर्षदाचे आई- वडील शेती करतात.
तर, जोड धंदा म्हणून पोल्ट्री फार्म चालवतात. वडिलांनी शेती करून या संपूर्ण प्रवासात मदत केली. तसेच या यशात आई – वडिलांचा ही सिंहाचा वाटा आहे. हर्षदाचे वडील कोथूर्णे गावचे माजी उपसरपंच होते. त्यामुळे घरात समाज कार्याचा वस आहे. त्यात मुलगी ग्रामविकास अधिकारी झाल्यामुळे वडिलांची मान अधिकच उंचावली आहे.
पोलीस उपनिरिक्षक व्हायचे
आता माझी महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. मला पोलीस उपनिरिक्षक होऊन माझे व माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तसेच माझ्या गावाचे, माझ्या भागाचे व माझ्या तालुक्याचे नाव मोठे करायचे आहे. आपल्या देशाची सेवा करायची आहे. तसेच माझ्या सारख्या अनेक मुलींनी स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त मुलांनी येऊन जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आई वडिलांचे नावलौकिक करावा, असे मत हर्षदाने व्यक्त केले.