वाघोली, (प्रतिनिधी) – सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग पडून दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले आहे, यामध्ये त्यांनी पुणे-नगर रोडवरील पुणे शहरापासून ते शिरूरपर्यंत सर्व होर्डिंग काढून टाकावेत, वार्याने होर्डिंग पडून मरण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आत्मदहनाची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
संभाजी ब्रिगेड च्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे पुण्यापासून शिरूरपर्यंत पुणे-नगर महामार्ग लगत असलेले सर्वच अधिकृत, अनधिकृत होर्डिंग 31 मे पर्यंत काढून टाकण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इथून पुढे कुठल्याही होर्डिंगला परवानगी देऊ नये अशी देखील मागणी केली आहे.
प्रशासनाने 31 मे पर्यंत सर्वच सरसकट होर्डिंग काढले नाही तर आम्ही 1 जून रोजी जिल्हाधिकारी आत्मदहन आंदोलन करण्याची मागणी करणार आहोत. कारण वार्याने होर्डिंग पडून मरण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्मदहन करू अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकार्यांना केली आहे.