आळंदी – शहरात दिवसाआड पाणीपुरवठा आणि विजेच्या लंपडावामुळे नागरिक वैतागले आहेत. जर हे आठ दिवसांत थांबले नाही तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना दिले आहे.
आळंदीत गेल्या सात ते आठ महिन्यांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. आणि त्यावेळेसच वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर पाणी चढत नाही. तर काही ठिकाणी पाण्याचा दाबही कमी असतो त्यामुळे मोटार लावणे अनिवार्य असते मात्र, वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना पाण्याविनाच राहवे लागते. त्यामुळे येत्या आठवड्यात यात सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने धनंजय धुंडरे, अमित धुंडरे, किशोर धुंडरे व प्रसाद बोराटे या सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.