गुवाहाटी – आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल जगदीश मुखी यांच्या अभिभाषणात भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार एक लाख तरुणांना रोजगाराचा मुद्दा वारंवार उपस्थित केल्याने अपक्ष आमदार अखिल गोगोई यांना सोमवारी आसाम विधानसभेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले.
राज्यपालांच्या भाषणात वांरवार अडथळे आणून घोषणाबाजी करणाऱ्या गोगोई यांना नंतर मार्शल करवी सभागृहातून बाहेर काढण्यात आले. तरूणांना एक लाख रोजगारा देण्याच्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्याबरोबरच गोगोई यांनी शेतकऱ्यांकडून भातखरेदी, स्थानिकांना जमिनीचा हक्क आणि पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार असे इतर मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
राज्यपालांचे भाषण संपल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. सरकारने अनेक आश्वासने दिली पण त्यादृष्टीने ते काहीच उपाययोजना करीत नाहीत असे गोगोई यांचे म्हणणे होते.