बारामती. जळोची – नवीन सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची एक दिवसीय कार्यशाळा बारामतीत आयोजित करणार आहे. त्यात त्यांची कामे, कामासाठी कोणाकडे पाठपुरावा करावा आदींबाबतचे मार्गदर्शन करणार आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. बारामतीत जनता दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी सरपंच, सदस्यांची पवार यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बारामती राष्ट्रवादीमय झाल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, बारामती राष्ट्रवादीमय कधी नव्हती? असा प्रति प्रश्न केला. गावचे प्रथम नागरिक, सदस्य म्हणून गावाने निवडून दिलेले लोक मला भेटले. काही भगिनींना तर अतिशय तरुण वयात चांगल्या पदावर कामाची संधी मिळाली आहे. त्यांचे मी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
पवार म्हणाले, वास्तविक मी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यामुळे माझ्याकडून बोलताना चूक व्हायला नको होती. परंतु ओघात ती झाली. त्याचे मोठे भांडवल केले. बोलण्याच्या ओघात या गोष्टी घडतात. मला लक्षात आल्यावर मी लागलीच चूक दुरुस्त करीत दिलगिरी व्यक्त केली. आपल्या मराठी संस्कृतीत वडीलधाऱ्य़ांनी आपल्याला जेथे चूक होते तेथे दिलगिरी व्यक्त करून पुढे जायची शिकवण दिली आहे.
ते म्हणाले की, नवीन कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. नवीन लोकांच्या हातात गावचा कारभार गेला पाहिजे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे चांगले निकाल लागले. तालुक्यात दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतात. परंतु गटातटात आम्ही पडत नाही. जो गट निवडून येईल त्यांना मदत करायची गावच्या विकासाला हातभार लावायचा ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण मी पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.