समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – नव्याने उभारण्यात आलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोर लावलेल्या पाटीवर तालुक्यातील गावांच्या नावांमध्ये अक्षम्य चुका झाल्या आहेत. स्वतःच्या कार्यालयासमोरील साधी “पाटी’ नीट लिहून घेऊ न शकणाऱ्या या कार्यालयात नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे “कागद’ लिहिले जातात हे विशेष!
जमीनीशी संबंधित खरेदी-विक्री, साठेखत, गहाणखत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र आदी कामे दुय्यम निबंधक कार्यालयात होतात. त्यासाठी नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे दस्त तयार करण्याचे म्हणजेच लिहिण्याचे अथवा “टाईप’ करण्याचे काम या कार्यालयात होते. सध्या या कार्यालयाचे कामकाज जुन्या इमारतीतून होते.
मात्र, आता तब्बल सव्वा कोटींचा चुराडा करून येथील तहसील कार्यालयासमोर दुय्यम निबंधक कार्यालय थाटण्यात आले आहे. कार्यालयाचे बांधकाम सुरू असताना त्याच्या दर्जाकडे फार कोणी लक्ष दिल्याचे ऐकिवात नाही. कार्यालयाचे उद्घाटनाचा मोठा गाजावाजा चालविला आहे.या दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर तालुक्यातील गावांच्या नावांची लावलेली एक पाटी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पाटीवर गावांची नावे लिहिताना अक्षम्य चुका झाल्या आहेत. तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांची नावे लिहिताना या चुका झाल्या आहेत. ही गावे तालुक्यातील नाहीतच मग ही गावे नक्की कुठली असा प्रश्न ही पाटी वाचणाऱ्या नागरिकांना पडत आहे.