संगमनेर – तालुक्यातील निमज गावात डीजे बंदीच्या निर्णयाला सपशेल हरताळ फासण्यात आला आहे. 150 महिलांनी दिलेला ग्रामपंचायत ठराव असतानाही डीजेबंदीला या मंडळींनी जुमानले नाही. याला ग्रामपंचायत पदाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे.
लग्नसमारंभ, वराती, वाढदिवस, विजयी मिरवणुका, यात्राउत्सव यासारख्या सर्वच कार्यक्रमांमध्ये सर्वत्र डीजेचा दणदणाट ऐकायला येत असतो. डीजेच्या डेसिबलवर पोलीस प्रशासनाने मर्यादा घालून दिले असतानाही ते नियम पायदळी तुडवत सर्वात जास्त आवाजाचे डेसिबल वाजविले जात असते. मात्र, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे गावातील वयोवृद्ध व लहान मुलांना त्रास होत आहे. या डीजेच्या आवाजामुळे ज्येष्ठांना तसेच लहान मुलांना हृदय विकाराचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे संपूर्ण निमज गावातून डीजेला हद्द पार करण्यासाठी गावातील महिला पुढे सरसावल्या आणि त्यांनी ग्रामपंचायतला याबाबत अर्ज करून ठराव मांडला. त्याला निमज गावचे सरपंच, उपसरपंच यांनी लगेच मान्यता देत गावच्या हिताचा निर्णय घेतला. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांना सुगीचे दिवस येतील, असे वाटत होते.
परंतु दोन दिवसांपूर्वी गावात पुन्हा डीजेचा आवाज घुमला. यावेळी काही महिलांनी सरपंचांना फोन द्वारेमाहिती दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या डीजे वाद्याला ग्रामपंचायत पदाधिकारीच जबाबदार असल्याचा दावा गावातील महिला करत आहे. विशेष म्हणजे काही महिलांनी सदस्याला फोन केला असता, “डीजे बंदीचा ठराव मांडलाच नाही” असे उत्तर देऊन कहर केला. त्यामुळे महिला संतप्त झाल्या असून “तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही” अशी प्रतिक्रिया गावातील महिला देत आहेत.
गावातील दीडशे महिलांच्या सह्यांनी डीजे बंदीचा ठराव दिला असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून गावात डीजे वाजवला गेला. आम्ही उपसरपंच यांना फोनवर जाब विचारला असता त्यांनी ११२ नंबरवर फोन करायचा अजब सल्ला दिला. मात्र, त्यांनी स्वतः फोन करून प्रशासनाला कळवले नाही किंवा डीजेवर काही कारवाई केली नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची डीजेला मूक संमती असल्याचे दिसून येते.
– संतप्त महिला, निमज,