नगर – वाळूंज शिवारात रेल्वेला लागलेली आग विझवण्यात महापालिकेचे अग्निशामक दल व्यस्त असतानाच नगर शहरात बसस्थानक परिसरातील सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंबर प्लाझा या व्यापारी संकुलात मोठी आग लागली. यात दोन कार्यालये पूर्णपणे जळून खाक झाली. तर संपूर्ण दुसरा मजला व तिसऱ्या मजल्यावरील काही भागाला आगीची झळ बसली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा नागरिकांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील एका चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयाला आग लागली. शेजारील एका कार्यालयालाही त्याची झळ बसली. कामकाजाचा वार असल्याने सर्वच कार्यालयात कर्मचारी होते. धूर दिसताच बहुतांश कर्मचाऱ्यांनी इमारतीतून पळ काढला. मात्र, दुसऱ्या मजल्यावर सहा नागरीक अडकले होते. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शिडी घेऊन दुसऱ्या मजल्यावर चढले व त्यांनी त्यांची सुटका केली. सायंकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.
तोपर्यंत संपुर्ण दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आत जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आग मोठी असल्याने त्यांना जीन्यातून खाली यावे लागले. पोलीस अधीक्षक राकेश ओला घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात फक्त घटनेची नोंद करण्यात आली होती. आग पूर्ण शांत झाल्यावर पंचनामा होऊन निश्चित नुकसानीचा आकडा सांगता येईल, असे पोलिसांनी सांगितले. आग मोठी असल्याने मनपासह एमआयडीसीचे बंबही मागवण्यात आले होते.
मात्र, महामार्गावरील वाहतूक इतरत्र न वळवल्याने गाड्या येण्यास उशीर होत होता. तसेच, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळेही बचाव व मदत कार्यात अडथळे येत होते. अंबर प्लाझाबाहेर असलेल्या अतिक्रमणांमुळेही वाहतूक कोंडी होत होती. आग मोठी असल्याचे समजताच आमदार संग्राम जगताप, ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.