नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला आहे. कालच पंतप्रधान मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यात आल्याची घोषणा केली असली तरी त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा मात्र अद्याप रद्द करण्यात आलेला नाही असे या संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. संघटनेच्या आंदोलनाच्या संबंधात रविवारी सकाळी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही या नेत्यांनी आज सांगितले.
शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर गेले वर्षभर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या वर्षपुर्ती निमीत्त संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात संसदेवर रोज ट्रॅक्टर मोर्चे काढण्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी या आधीच केली आहे. रोज पाचशे शेतकरी आपल्या ट्रॅक्टर घेऊन संसदेवर जातील. अधिवेशन संपेपर्यंत हे मोर्चे तिकडे काढण्यात येणार होते. तो कार्यक्रम अजून रद्द करण्यात आलेला नाही असेही संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी आज स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या घोषणेचे संयुक्त किसान मोर्चाने स्वागत केले असले तरी जो पर्यंत प्रत्यक्ष संसदेतील विधेयकाद्वारे हे तीन कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी या आधीच जाहीर केला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर कमिटीचे सदस्य दर्शन पाल यांनी सांगितले की सिंघु बॉर्डरवर उद्या आमच्या संघटनेच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात आंदोलनाच्या वर्षपुर्ती निमीत्त होणाऱ्या अन्य आंदोलनांच्या संबंधात अंतिम निर्णय घेतला जाईल.