मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने गतवर्षी आणलेल्या तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. हे कायदे मागे घेण्यात यावेत या प्रमुख मागणीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, तामिळनाडू व देशातील इतर कृषिप्रधान राज्यांतील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर जवळपास वर्षभरापासून ठिय्या धरून बसले आहेत.
पंतप्रधानांनी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली असली तरी जोपर्यंत संसदीय प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी काळे कायदे मागे घेण्याच्या निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेना पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेख “व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’… अहंकाराचा पराभव!”मधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
दरम्यान, सामानाच्या आजच्या अग्रलेखातून एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर तिखट शब्दांमध्ये ताशेरे ओढण्यात आले आहेत तर दुसरीकडे राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणून हिणवणाऱ्यांचाही समाचार घेण्यात आलाय.
सामनाच्या अग्रलेखात, “सरकारला हे तीन काळे कायदे मागे घ्यावेच लागतील, मी काय म्हणालो हे लक्षात ठेवा’’ असे राहुल गांधी जानेवारीमध्ये म्हणाले होते. राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणून हिणवणाऱ्यांनीही हे आता लक्षात घेतले पाहिजे.” असं म्हटलंय.
अग्रलेखात, “लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना भाजपच्या मंत्रिपुत्राने चिरडून मारले. त्या ‘जालियनवाला बाग’सारख्या हत्याकांडाविरुद्ध सार्वत्रिक बंद पुकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. न्याय, सत्य आणि राष्ट्रवादाच्या लढाईत महाराष्ट्राने नेहमीच निर्भय भूमिका घेतली. यापुढेही अशी भूमिका घ्यावीच लागेल.” असं म्हणत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने लखीमपूर प्रकरणाविरोधात पुकारलेल्या बंदचे समर्थन करण्यात आलं आहे.