नवी दिल्ली : आजपासून लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या सुमारे 750 शेतकऱ्यांना ही श्रद्धांजली आहे. अशा शब्दात टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश टिकैत म्हणाले की, शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या सुमारे 750 शेतकऱ्यांना ही श्रद्धांजली आहे. इतर मुद्द्यांवरही आमचा विरोध सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. किमान आधारभूत किंमत (MSP) सारखे मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
याआधी ते म्हणाले होते की, देशात निदर्शने होऊ नयेत, अशी सरकारची इच्छा आहे, पण एमएसपीसह इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याशिवाय आम्ही आंदोलनस्थळ रिकामे करणार नाही.