Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतले. त्यानंतर आता काँग्रेसमधील अनेक नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता प्रणिती शिंदे या देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या रक्तात काँग्रेस आहे. पक्षातून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना परत आणण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. उलट आम्ही भाजपला नष्ट करू,” असा इशारा प्रणिती शिंदे यांनी दिला.
प्रणिती शिंदे या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि जी आमची माणसं भाजपमध्ये गेली त्यांना परत आणण्याची ताकद आमच्यात आहे आणि आम्ही ते करून दाखवणार. काँग्रेस जिथे जिथे लढेल तिथे आम्ही जिंकणार. भाजपच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. भाजप इतर नेत्यांवर दबाव टाकत आहे. या सर्व गोष्टींना नागरिक कंटाळले आहेत.”
पुढे त्या म्हणाल्या, “अशोक चव्हाण हे भाजप सोबत गेले, मात्र त्यांना प्रचंड प्रेशर करण्यात आलं, त्यांनी अंतर्गत कारणामुळे काँग्रेस सोडली. नांदेडमधील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्यासोबत भाजपच्या वाटेवर कोणीही नाही. जे गेले त्यांना काही पर्याय नव्हता. भाजप त्यांना मानसिकरित्या त्रास देत होते.”
भाजपला आम्ही नष्ट करू -प्रणिती शिंदे
सोलापूर लोकसभा लढवण्याबाबत त्या म्हणाल्या की, “काँग्रेस पक्ष लोकसभेची तयारी करीत आहे. कोण कुठे लढणार हे अद्याप ठरलेलं नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. शंभर टक्के आमच्या रक्तात काँग्रेस आहे. जे पक्षातून गेले आहेत त्यांना परत आणण्याची आमच्यात क्षमता आहे. मरेपर्यंत मी काँग्रेसमध्ये असेल. माझे तत्व भाजप सोबत तडजोड करू शकत नाही. मी काँग्रेस सोबतच काम करणार तो विचार सगळीकडे पसरवणार आणि भाजपला आम्ही नष्ट करू, “असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.