नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल यांनी ‘वारीस दे पंजाब’या संघटनेचा नेता आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्यावर पंजाब आणि केंद्र सरकारने केलेल्या संयुक्त कारवाईचे कौतुक केले आहे. देशविरोधी शक्तींवर कारवाई झालीच पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. एएनआयशी बोलताना बन्सल म्हणाले, “अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस, पंजाब सरकार आणि केंद्र सरकार करत असलेले काम कौतुकास्पद आहे. देशविरोधी घटकांना सोडले जाऊ नये अशीच आमची भूमिका राहिली आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावर हल्ला करणाऱ्या खलिस्तान समर्थकांवर अशी कारवाई करण्याची गरजच होती असे त्यांनी म्हटले आहे. आयएसआय, पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांकडून त्याने आर्थिक मदत घेतली आहे. या घटनेचे राजकारण करणाऱ्यांनी पक्षीय राजकारणाकडे दुर्लक्ष करून याचा निषेध केला पाहिजे. आम्ही कोणालाही देशाच्या भावना दुखावू देऊ शकत नाही, असेही त्यांनी या मुलाखतीत नमूद केले. तत्पूर्वी, पंजाब पोलिसांनी शनिवारी खलिस्तान समर्थक नेते अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कारवाई सुरू केली.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 114 अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. यापूर्वी, केंद्रीय एजन्सीच्या सूत्रांनी माहिती दिली की अधिकाऱ्यांनी रविवारी दलजीत सिंग कलसी उर्फ सरबजीत सिंग कलसी याला अटक केली आहे जो अमृतपाल सिंगचा कथित सल्लागार आणि वित्तपुरवठादार होता.दरम्यान, अमृतसरमधील जल्लूपूर खेरा गावात अमृतपाल याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी पंजाब राज्याच्या विविध भागात फ्लॅग मार्च काढले.