हिमांशू
“प्रेम कुणावरही करावं,’ असं कुसुमाग्रज सांगून गेले असले, तरी लग्न कुणाबरोबर करावं, हे अद्याप कुण्या कवीनं सांगितल्याचं आम्हाला ज्ञात नाही. सगळ्यांच्याच नशिबात प्रेमविवाह नसतो; पण लग्नानंतरही लोक जोडीदारावर प्रेम करतातच. जोडीदार समलैंगिकसुद्धा असू शकतो आणि त्याच्याशी लग्न करण्याच्या हक्कासाठी संबंधितांकडून न्यायालयातही दाद मागितली जाते. सर्वोच्च न्यायालयात याविषयी सुनावणी सुरूही आहे. मध्यंतरी काहीजणांनी स्वतःशीच लग्न करण्याचा “प्रयोग’ केला.
(किंवा “दाखवला’ असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल.) स्वतःवर प्रेम सगळेच करतात; पण त्यासाठी एकटं राहण्याचा पर्याय स्वीकारल्यास लग्नाचे विधी आणि उत्सवी वातावरण अनुभवता येत नाही, म्हणून स्वविवाह! असो, विवाह स्वतःशी केला काय आणि समलैंगिक जोडीदाराशी केला काय, जोपर्यंत माणूस माणसाशी लग्न करतोय तोपर्यंत आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण मुलीचा कुत्र्याशी आणि मुलाचा कुत्रीशी विवाह लावणाऱ्या आईवडिलांना काय म्हणायचं? पाऊस पडत नाही म्हणून गाढवाचं लग्न लावणारे आपल्याला भेटतात. पाऊस पडो न पडो; पण गाढवाचं लग्न गाढवीशीच लावलं जातं हे महत्त्वाचं.
काही ठिकाणी पाऊस पडावा म्हणून बेडकांचंही लग्न लावलं जातं; परंतु त्यातही नवरा-नवरी बेडूकच असतात. अंधविश्वासाला आगतिकतेचं नाव देऊन पावसासाठी केलेले असे प्रकार नजरेआडही करता येतील; पण मुलाला पहिला दात आल्याबरोबर त्याच्यासाठी नवरी म्हणून कुत्रीचा शोध घेणाऱ्या बापाला काय करायचं? ओडिशामध्ये नुकताच घडलेला हा प्रकार केवळ धक्कादायक नव्हे तर मानवी विचारशक्तीच्या पलीकडचा आहे. बालविवाहाला कायद्यानं बंदी आहे; पण तरीही महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या म्हणवल्या जाणाऱ्या राज्यातही काही ठिकाणी बालविवाह अजून होतात. ओडिशात तर अकरा वर्षांच्या मुलाचं लग्न चक्क कुत्रीसोबत लावलं गेलं आणि सात वर्षांच्या मुलीचं लग्न कुत्र्यासोबत! बालासोर जिल्ह्यातल्या एका आदिवासी गावात हा लग्नविधी रात्रभर सुरू होता.
प्रथेनुसार, लग्नविधीला रात्री सुरुवात होते आणि सकाळी सात वाजेपर्यंत जेवणाच्या पंगती चालल्या. हे लग्न केवळ विधी म्हणून लावलं गेलं नाही तर नेहमीच्या लग्नासारखीच सजावट या श्वानांच्या लग्नासाठी केली गेली. लग्नघराबरोबरच वधू कुत्री आणि वर कुत्रा यांनाही सजवलं गेलं. लग्न झाल्यावर वधू कुत्रीला निरोप देण्याचा समारंभ अगदी माणसासारखाच झाला. हे सगळं कशासाठी? तर वाईट आत्म्यांपासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी! तसेच मुलाला किंवा मुलीला पहिला दात आला की वडील वराचं किंवा वधूचं संशोधन सुरू करतात. म्हणजे कुत्रा किंवा कुत्री शोधू लागतात आणि अगदी लहान वयात या कुत्र्यांसोबत मुलांची लग्नं लावून दिली जातात. लग्न लागल्यानंतर मुलांच्या आसपास फिरणारे वाईट आत्मे कुत्र्याच्या शरीरात जातात.
पिढ्यान्पिढ्या या चालीरीती यथासांग सुरू आहेत. खरं तर समाजात शहाणपण पेरण्याची सोय भारतीयांना जगात सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध आहे. तरीसुद्धा बदलायचंच नाही, असं ठामपणे ठरवलं तर काय करणार? एकीकडे, मुलांची कुत्र्यांशी लग्नं लावण्याची अंधश्रद्धा दिसते तर दुसरीकडे माणसाच्या लग्नासारखा खर्च करून पाळीव कुत्रा-कुत्रीचं लग्न करण्याचा भंपकपणाही दिसतो. इलेक्ट्रिक टॉय कारमधून नवरदेवाला वाजतगाजत आणलं जातं. लग्नापूर्वी वधुवरांना पसंती विचारतात की नाही? पत्रिका वगैरे बघतात का? विचारलं पाहिजे!