– हिमांशू
जीवनाचा वेग वाढत चाललाय. ज्याच्या जगण्याला वेग नाही, त्याच्या जगण्याला अर्थ नाही. ग्रामीण, निमशहरी भागातलं शांत, संथ जगणं असह्य होऊन लोक वेगानं शहरांकडे धावत सुटतात आणि मग आयुष्यभर धावतच राहतात. शहर त्यांना शांत बसूच देत नाही. वाढत्या वेगाबरोबरच आपल्या आवडीनिवडीही वेगवान, आक्रमक झाल्या. जगण्यात वेग आला तसा वृत्तीत आवेग आला. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा केवळ शतक झळकावणं पुरेसं ठरत नाही, तर कमीत कमी वेळात, कमीत कमी चेंडूंत जो शतक झळकावेल तो खरा फलंदाज ठरतो. विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा सर्वांत वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला. सध्या तो भलताच फॉर्मात आहे.
पण हाच वेग त्याने रस्त्यावर आणला आणि मुंबई ते पुणे अंतरात तीन ठिकाणी “ओव्हरस्पीडिंग’बद्दल दंडाची चलनं त्याला मिळाली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी तो येत होता. लॅम्बॉर्गिनी कुळातली त्याची गाडी भारतात सव्वातीन कोटी रुपयांच्या आत येत नाही. टॉप मॉडेल पाच कोटी रुपयांचं आहे, असं म्हणतात. इतकी शानदार गाडी चालवताना मनावर आणि वेगावर नियंत्रण कसं राहणार! सामान्यतः शंभर, एकशेवीस किलोमीटर प्रतितास वेगानं चालणाऱ्या गाडीत बसलं तर आपल्या पोटात गोळा येतो. हा पठ्ठ्या ताशी दोनशे किलोमीटर वेगानं गाडी दामटत होता म्हणे! काही ठिकाणी त्याच्या गाडीचा वेग ताशी 215 किलोमीटर इतका नोंदवला गेला, असं अधिकारी सांगतात.
एखाद्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला तरी चालेल; पण सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वाहन हळू चालवा, अशा आशयाचे फलक रस्त्यांवर जागोजागी टांगलेले असतात. अर्थात, 215 किलोमीटर वेगानं गाडी चालली असेल, तर हे फलक वाचता येणंही शक्य नाही. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, की जे लोक देशासाठी, समाजासाठी अनमोल असतात त्यांनाच स्वतःच्या सुरक्षिततेचं मोल कसं कळत नाही? गेल्या वर्षी आपल्या सहकाऱ्याचा किती भीषण अपघात झाला होता, एवढं तरी रोहितला आठवायला हरकत नव्हती. यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंत गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या अपघाताच्या वेदनांमधून अद्याप पुरता बाहेरसुद्धा आलेला नाही. दिल्लीहून रुडकीला जात असताना झालेल्या अपघातात ऋषभच्या लिगामेन्टला गंभीर दुखापत झाली होती.
त्यानेही वेगमर्यादा पाळली नव्हती आणि गाडी दुभाजकाला धडकून घासत पुढे गेली तेव्हा त्याला ती नियंत्रित करता आली नाही. घर्षणामुळे गाडी पेटली आणि ऋषभची पाठ भाजली. रात्रीच्या वेळी अपघात होऊनसुद्धा रस्त्यावर काहीजण होते आणि ऋषभला त्यांनी रुग्णालयात पोहोचवलं, हे त्याचं नशीब! त्याच्या जळालेल्या मर्सिडीज गाडीचे फोटोही बघवत नव्हते. संकटाला आमंत्रण देणारी ही कसली घाई? हल्ली आलिशान मोटारींची बरीच चलती आहे.
देशात एकीकडे कुपोषणाचा निर्देशांक घसरत चाललेला असताना दुसरीकडे बक्कळ पैसा असलेला वर्गही वाढतोय आणि अशा गाड्यांची विक्रीही वाढतेय. मोटारी बनवणाऱ्या कंपन्याही ती किती वेळात कुठून कुठे पोहोचते, एवढ्याच मुद्द्याची जाहिरात करतात. एरवी खराब खेळ केल्याबद्दल क्रिकेटपटूंना ट्रोल करणारे सोशलवीर अशा वेळी गप्प बसतात, याचंही आश्चर्य वाटतं. आपल्या लाडक्या खेळाडूची कानउघाडणी करण्यासाठी, वेगवान ड्रायव्हिंगची त्याची सवय बदलण्यासाठी सोशल मीडियाचा वापर का करू नये?