– हिमांशू
इतिहासाचा अभ्यास इतिहास घडवण्यासाठी करावा, असं सांगितलं जातं. त्याच वेळी भूतकाळात रमणं भविष्यासाठी चांगलं नाही, असं म्हणणाराही एक वर्ग आढळतो. सध्याच्या काळात दुसऱ्या वर्गातले लोक संख्येने अधिक असावेत. जे गेले ते काळाचं आणि जे येणार आहे ते आपलं, असं मानणाऱ्यांचा हा वर्ग जे येईल ते एकतर आनंदाने किंवा अपरिहार्य म्हणून स्वीकारतो. “मोबाइल नव्हते तो काळ खरोखर चांगला होता,’ असं म्हणणारा एखादा मित्र भेटला तर बाकीचे त्याच्यावर तुटून पडतात. “पूर्वीच्या चित्रपटांना दर्जा होता,’ असं कुणी म्हटलं की संबंधिताला “नॉस्टॅल्जिक’ म्हणून हिणवायला सुरुवात करतात.
“नॉस्टॅल्जिया’ अर्थात भूतकाळात रमण्याची प्रवृत्ती चांगली की वाईट, यावर बऱ्याच चर्चा झडतात. परंतु “ठेविले अनंते तैसेचि राहावे’ ही प्रवृत्ती भूतकाळातही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. भूतकाळातलं जे त्याज्य आहे, वाईट आहे ते विसरून जावं; मात्र जे चांगलं होतं ते सोबत घेऊन पुढील वाटचाल करावी, असा समंजस मध्यममार्गी विचार करणारे लोक संख्येने अगदीच अल्प असतात. बदलत्या जीवनशैलीमुळेही अनेकांना कालच्या दिवसावर फुली मारणं अपरिहार्य ठरतं. परंतु भूतकाळातल्या आठवणी काढणं मानसिक आरोग्यासाठी फायद्याचं असतं, असं नव्या संशोधनात आढळून आलंय. बऱ्याच आठवणी कटू असतात हे खरं; पण चांगल्या स्मृतीही असतातच! कटू-गोड आठवणी जीवनाचा अर्थ सांगतात, असं संशोधक सांगतात.
मुळात फार काळ दुःख करत बसणं हा मानवी स्वभाव नाही. कोणत्याही दुःखद घटनेमुळे आयुष्य ठप्प होत नाही. त्यामुळे फुरसतीच्या क्षणांमध्ये भूतकाळ मनात डोकावलाच, तर त्यातलं चांगलंच आपल्याला सगळ्यात आधी आठवतं. आपलं आयुष्य चांगल्या-वाईट घटनांची मालिका असल्यामुळे चांगल्या स्मृतींना लटकलेल्या काही कटू गोष्टीही आठवतात. त्यामुळे आपल्याला घटनांची संगती लावून त्यांचा अर्थ समजून घेणं शक्य होतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. भूतकाळाचा विचार करायला सवडच नाही आणि ते योग्यही नाही असं मानणाऱ्यांचा किंवा भूतकाळात रममाण होऊ पाहणाऱ्याची हेटाळणी करणाऱ्यांचा वर्ग स्वतः कधीतरी भूतकाळात जातच असतो.
फक्त त्याविषयी खुलेपणानं बोलत नाही, इतकंच! खरं तर आजकाल आपल्याला जुन्या गोष्टी आठवल्याच तर आपल्या गमावलेल्या क्षमताही आठवतात. उदाहरणार्थ, केवळ लॅंडलाइन फोन उपलब्ध असण्याच्या काळात आपल्याला अनेक नंबर तोंडपाठ असायचे. आज दोन सिमकार्ड वापरणाऱ्या अनेकांना आपलाच एखादा नंबर माहीत नसतो. तो पाठ करायची वेळच कधी आलेली नसते. ही गमावलेली क्षमता परत मिळवायची झाल्यास काय करावं लागेल, असा विचार आपण आठवणीत गेलो तरच करू शकतो ना?
व्यक्तिगत स्मरणशक्तीबरोबरच समाजाची एक सामूहिक स्मरणशक्तीही असते. बऱ्याच गोष्टी समाज म्हणून आपण पाठीवर टाकतो आणि पुढे चालत राहतो. त्याचा फायदा समाजातला स्वार्थी आणि लोभी वर्ग नेहमीच घेत असतो. येईल ते स्वीकारण्याच्या मनोवृत्तीमुळे हळूहळू आपल्याला प्रश्न पडणं बंद होतं. त्यामुळे मग उत्तरं शोधण्याचीही आवश्यकता उरत नाही. कधीकधी आपल्या त्रासांचं, दुःखांचं मूळ अशाच एखाद्या किरकोळ प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं असतं. प्रश्नच पडले नाहीत, तर आपण कुणाच्यातरी हातचं बाहुलं बनणार, हे निश्चित!